उमरगा : तालुक्यातील जकेकूर येथे वर्षावास प्रारंभ कार्यक्रमानिमित्त आम्रपाली बौद्ध विहार येथे ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे पठण करण्यात येत आहे. याचा शुभारंभ भन्ते डी. धम्मसार, भन्ते सुमेध नागसेन, भन्ते सुमंगल यांच्या उपस्थितीत धम्म देसना आणि खीरदानाने करण्यात आला.
यावेळी वर्षावासाबाबत माहिती देताना भन्ते नागसेन म्हणाले, भगवान बुद्धांच्या आदेशानुसार भिक्खू संघ धम्म प्रचारासाठी सर्व ऋतूत चारही दिशांना पायी फिरत असत. या तिन्ही ऋतूत त्याना अनेक संकटांचा सामना करावा लागला. त्या काळी खूप पाऊस पडत असे. पावसामुळे भिक्खूंना भिक्षाटनासाठी जाता येत नसल्याने अनेकदा त्यांची उपासमारही होत असे. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असताना नदीनाल्यांना आलेल्या पुरात अनेक भिक्खू वाहून जात आणि अनेक भिक्खूंना यामध्ये जीव गमवावा लागत असे. पावसाळ्यात अनेक आजारांचा भिक्खू संघाला सामना करावा लागत होता. हे सर्व लक्षात घेऊन भगवान बुद्धांनी भिक्खू संघाला आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या कालावधीत धम्मदेसना देण्याचे सूचित केली. यानुसार आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा हा काळ वर्षावास म्हणून साजरा केला जातो,असे त्यांनी सांगितले.
धम्मदेसना कार्यक्रमानंतर समाजबांधवांना खीर दान करण्यात आली. सायंकाळी दीपक लांडगे (निलंगेकर) यांचा बुद्ध - भीम गीतांचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमासाठी पवन कांबळे, विजय कांबळे, नवनाथ कांबळे, व्यंकट सोनकांबळे आदींनी पुढाकार घेतला.