उस्मानाबाद : राज्य परिवहन महामंडळाची बस प्रवाशांअभावी थांबली आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या ये-जा होत नसल्याने प्रवाशांची संख्या रोडावली आहे. सध्या जिल्ह्यातून लांब पल्ल्याच्या ट्रॅव्हल्स सुरू आहेत. मात्र, नागरिक कोरोनाच्या भीतीने घराबाहेर पडायला तयार नाहीत. त्यामुळे एसटीप्रमाणेच ट्रॅव्हल्सलाही मोठा आर्थिक फटका बसत आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या लांब पल्ल्याच्या बसेस बंद आहेत. मात्र, प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी शहरातून नागपूर, मुंबई, औरंगाबाद, पुणे या ठिकाणी ये-जा करण्यासाठी ट्रॅव्हल्सने उपलब्धता करून दिली आहे. असे असतानाही कोरोनाचा प्रकोप पाहता नागरिकांची वर्दळ कमी आहे. अत्यावश्यक कामासाठी नागरिक घराबाहेर पडत आहे. विशेष करून लांब पल्ल्याचा प्रवास करताना स्वत:सह खबरदारी घेत आहेत. यामुळे उस्मानाबादेतून बाहेर जाणाऱ्या व बाहेरून उस्मानाबादेत येणाऱ्या ट्रॅव्हल्सची संख्या मोजकीच आहे. जिल्ह्यात अशा एकूण १२ ते १५ ट्रॅव्हल्स आहेत. सध्या उस्मानाबाद शहरातील ट्रॅव्हल्स बंद आहेत. ट्रॅव्हल्सला पुरेसे प्रवासी मिळत नाहीत. यामुळे टॅव्हल्स मालकही चिंतेत सापडले आहेत. आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी प्रवाशांची संख्या वाढावी, अशी अपेक्षा चालकांना आहे. उस्मानाबाद शहरातील ट्रॅव्हल्स धावत नसल्या तरी निलंगा-पुणे, नागपूर-सोलापूर, सोलापूर-औरंगाबाद, मुंबई -उस्मानाबाद अशा ट्रॅव्हल्स धावत आहेत. प्रवाशांची संख्या कमी आहे. मोठ्या मुश्किलीने उस्मानाबादेत ५० ते ६० प्रवासी येत असल्याची नोंद ट्रॅव्हल्सकडे झाली आहे. दरम्यान, ट्रॅव्हल्स चालकांकडून कोरोना नियमांचे काटेकोर पालन केले जात असल्याचे आढळून आले.
मास्कशिवाय प्रवेश नाही
कोरोना नियमावलीचे पालन करीत वाहतूक व्यवस्था सुरू ठेवण्यात आली आहे. दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणात बाधितांची संख्या वाढत आहे. यामुळे नागरिक स्वत:हून मास्क लावल्याशिवाय आतमध्ये प्रवेश करीत नाहीत. याशिवाय जाणाऱ्यांची संख्या कमी असल्याने फिजिकल डिस्टन्स आपोआपच पाळले जाते.
कुणावरही कारवाई नाही
नियमांचे पालन न केल्यास अशा वाहनचालकांवर कारवाई करण्याच्या सूचना आहे. त्यासाठी विविध ठिकाणी वाहनांची तपासणी होत आहे. आतापर्यंत खासगी ट्रॅव्हल्स अनेकवेळा तपासल्या आहेत. मात्र, कुणावरही कारवाई झाली नाही. मास्क आणि फिजिकल डिस्टन्स पाळले गेल्याने ही कारवाई थांबली आहे.
ई-पास कोणाकडेच नाही
बाहेर जाण्यासाठी ई-पासची आवश्यकता आहे. वाहनांना मात्र त्यामधून सूट असल्याचे बोलले जात आहे. कुणाकडेही सध्या ई-पास नाही. वाहतुकीसाठी मोकळीक देण्यात आल्याने ट्रॅव्हल्स दररोज ये-जा करीत आहेत. मात्र, त्यांचे प्रमाण नगण्य आहे.