उस्मानाबाद : येथील जिल्हा कारागृहात विविध गुन्ह्यांत अटकेत असलेल्या कैद्यांनी परिसरात शेती फुलविली असून, भाजीपाल्यासह इतर पिके घेतली जातात. इथे पिकणाऱ्या फळभाज्या दैनंदिन आहारात वापरल्या जात आहेत. कैद्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या फळभाज्यांचे उत्पादन वाढल्याने अतिरिक्त ठरणाऱ्या फळभाज्या लातूर व सोलापूर कारागृहात पाठविल्या जात आहेत.
शहरातील जिल्हा कारागृहाची क्षमता २६९ आहे. विविध गुन्ह्यांतील २८४ कैदी आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून कारागृहावर ताण येत आहे. कारागृहात परिसरात ९ एकर २५ गुंठे जागा शेतीसाठी आहे. अनेक वर्षांपासून तेथे विविध पिके घेतली जात आहेत. १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीत मेथी, करडी, राजगिरा, पालक, शेपू या पालेभाज्या व डांगर, दुधी भोपळा, वांगी, मुळा, भेंडी, शेवगा, टोमॅटो, फ्लाॅवर या फळभाज्यांची लागवड करण्यात आली होती. यातून ५ लाख ४० हजार ७९० रुपयांचे उत्पादन काढण्यात आले आहे. कामासाठी कमीत कमी मनुष्यबळ, वेळेत पिकांची लागवड, मशागत, निगा यामुळे उत्पादन वाढले आहे. सद्य:स्थितीत शेवगा, भेंडी, डांगर, वांगी, असे फळभाज्यांचे उत्पादन सुरू असून, या फळभाज्या सोलापूर व लातूर येथील जिल्हा कारागृहात पाठविल्या जातात.
चौकट..
९ एकर क्षेत्रावर
बियाणे, खते, बंदी मंजुरीसाठी ९१ हजार ७६४ रुपये खर्च झाला होता. त्यातून ५ लाख ४० हजार ७९० रुपये उत्पादन मिळाले आहे. या पूर्वीच्या मागील तीन आर्थिक वर्षात विक्रमी उत्पादन घेतल्याने कारागृह प्रशासनाने याची दखल घेऊन अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला आहे.
कोट...
सुयोग्य पाण्याचे नियोजन कृषी विभागाचे कृषी सहायक यांच्या मार्गदर्शनाखाली कारागृह प्रशासनाच्या देखरेखीखाली कारागृह शेतीत उत्पादन घेतले जात आहे. उस्मानाबाद कारागृहासह लातूर व सोलापूर कारागृहात येथील भाजीपाला पाठविला जात आहे.
एकनाथ शिंदे, कारागृह अधीक्षक, उस्मानाबाद.