पाथरुड : भूम तालुक्यातील सर्वात मोठे विद्युत उपकेंद्र असलेल्या पाथरुड येथील ३३ केव्ही उपकेंद्रातून होणारा विद्युत पुरवठा बुधवारी ऑपरेटर व विद्युत कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झालेल्या मतभेदांमुळे दिवसभर खंडित राहिला. यामुळे पाथरुडसह परिसरातील जवळपास १५ गावांमधील नागरिकांची मोठी गैरसोय झाली.
पाथरुड ३३ केव्ही विद्युत उपकेंद्रातून पाथरुडसह नान्नजवाडी, बागलवाडी, उमाचीवाडी, वडाचीवाडी, दुधोडी, सावरगाव, आनंदवाडी, नळीवडगाव, घुलेवाडी, अंतरवली, नळी अशा जवळपास १५ गावांना घरगुती व कृषीपंपासाठी विद्युत पुरवठा करण्यात येतो. बुधवारी येथील ऑपरेटर व विद्युत कर्मचारी यांच्यात काही कारणावरून मतभेद झाले. यातूनच चक्क दिवसभर उपकेंद्रातून होणारा विद्युत पुरवठा बंद राहिला. यामुळे लाॅकडाऊनमध्ये व उकाड्यात घरात थांबलेल्या नागरिकांचे प्रचंड हाल झाले. कृषीपंपाचाही विद्युत पुरवठा खंडित असल्याने अनेकांच्या जनावरांनाही पाणी मिळाले नाही. त्यामुळे या गंभीर प्रकाराकडे वरिष्ठांकडून लक्ष देण्याची मागणी होत आहे.
कोट......
पाथरूड येथील उपकेंद्रांमध्ये सर्व यंत्रचालक, ऑपरेटरचा मनमानी कारभार चालू आहे. सदर ऑपरेटर दोन ते तीन दिवस ड्यूटी करत असून, त्याच्यामुळे लाईनमनच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे. यंत्रचालक गैरहजर असल्यामुळे स्वतः लाईनमन लाईट बंद करीत आहेत. यंत्रचालकाच्या हलगर्जीपणामुळे वीज ग्राहकांना सुरळीत वीज भेटत नाही.
- एन. के. बाराते, वरिष्ठ तंत्रज्ञ, पाथरूड
वरिष्ठ तंत्रज्ञ यांनी परमिट न घेता विद्युत पुरवठा बंद केला होता. त्यामुळे दिवसभर विद्युत पुरवठा बंद राहिला.
- आरती जाधव, ऑपरेटर,
ऑपरेटर व वरिष्ठ तंत्रज्ञ यांच्या वादामुळे पाथरूडमध्ये दिवसभर वीज पुरवठा बंद होता. याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर देखील झााल. त्याच्यामुळे लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे वरिष्ठांनी याची चौकशी करावी.
- संजय केंद्रे, ग्रामविकास अधिकारी