उस्मानाबाद : कोरोनामुळे अनेकजण घरात बसून आहेत. त्यामुळे संवादाचे प्रमाण कमी झाले आहे. संवादाची दरी वाढल्याने त्याचा परिणाम माणसाच्या मानसिक स्वास्थ्यावर होत आहे. यातून नैराश्य, चिडचिडेपणा, व्यसनाधीनता अशा समस्या वाढल्याचे समोर येत आहे. मानसिक स्वास्थ्यासाठी संवाद महत्त्वाचा असल्याचे मत मानसोपचारतज्ज्ञांनी व्यक्त केले.
एकमेकांशी संवाद साधून मन हलके होते. तसेच त्यातून आनंदही मिळत असतो. त्यामुळे जीवनात उत्साह राहत असतो. मात्र, मागील दीड वर्षापासून कोरोना संसर्गामुळे नागरिक घरातच बसून आहेत. घरातच बसून राहिल्याने संवाद कमी झाला आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत. त्यातच संवाद नसल्याने एकटेपणामुळे नैराश्य, स्मृतिभ्रंश, चिंता वाढली आहे. तरुण वर्गामध्ये संवादाअभावी डिप्रेशन वाढले आहे. शिवाय, एकटेपणा दूर करण्यासाठी व्यसनांच्या आहारी जात आहेत. सर्व व्यक्ती घरातच राहत असल्याने महिलांना घरातील काम वाढले आहे. त्यामुळे त्यांच्यामध्येही चिडचिडेपणा वाढत आहे. लहान मुलांचे वजन वाढले आहे. मोबाईलचा वापर वाढला आहे. त्यामुळे डोळ्यांच्या समस्या जाणवत आहेत.
मन हलके करणे हाच उपाय
कोरोना काळात अनेक जण घरात राहिले. त्यामुळे मैत्र-मैत्रिणी, नातेवाईक, समाजाशी संवाद कमी झाला. त्यामुळे नैराश्य वाढले.
संवाद साधण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. मोबाईलवरून संपर्क साधून संवाद साधला जात आहे. मात्र, समोरासमोर बोलल्याने जे मन हलक होते त्या प्रकारे मन हलके होत नाही.
मानसिक स्वास्थ्यासाठी एकमेकांशी संवाद साधणे महत्त्वाचे आहे. त्यातून मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यास मदत होते.
मानसोपचारतज्ज्ञ म्हणतात...
संवाद हरवत चालल्याने ज्येष्ठांमध्ये स्मृतिभ्रंश आजार जडत आहे. त्यातून आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे एकटेपणात न राहता एकमेकांशी संवाद साधणे महत्त्वाचे आहे. संवादातून आनंद मिळतो. त्यातून मन हलके होते.
डॉ. महेश कानडे, मानसोपचारतज्ज्ञ
एकटेपणात असलेल्या व्यक्ती जास्त विचार करतो. खूप दिवस संवादापासून दूर राहिल्यास व्यक्ती नैराश्यात जातो. नागरिकांनी सतत सक्रिय राहून नातेवाईक, मित्रांशी मन हलके करावे.
डॉ. राजेश नरवडे, मानसोपचारतज्ज्ञ