उस्मानाबाद : कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर असल्याचा इशारा दिला जात आहे. त्यात प्रामुख्याने यावेळची संक्रांत ही बालकांवर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सोबतच तरुणाईलाही धोका आहे. दुसऱ्या लाटेत बाधित आढळण्याचे प्रमाण हे १८ ते ४४ वयोगटातील अधिक होते. त्यामुळे या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण वेगाने होणे गरजेचे आहे. असे असतानाही केवळ लसींचा पुरवठा पुरेसा होत नसल्याने या घटकाला लसीला मुकावे लागत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात या घटकातील केवळ साडे नऊ टक्के जणांनाच पहिला डोस मिळाला आहे.
हेल्थ केअर वर्कर्स व फ्रंटलाईनर्स आघाडीवर...
लस घेण्यात हेल्थ केअर वर्कर्स आघाडीवर आहेत. ॲपवर नोंदणी केलेले १०३५१ हेल्थ वर्कर्स होते. प्रत्यक्षात ही संख्या वाढत गेली. त्यामुळे ११५५१ जणांनी पहिला तर ७१९६ जणांनी दुसरा डोस घेतला आहे.
फ्रंटलाइन वर्कर्सची नोंदणी २०७९९ इतकी झाली होती. प्रत्यक्षात ३४२६३ जणांना पहिला तर १२४३० जणांना दुसरा डोस मिळाला आहे.
१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण उशिरा झाले; मात्र तरीही याला गती आलेली नाही. ७ लाख ३४ हजार ५६६ जणांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी आता कुठे ६९६०८ जणांना पहिला तर केवळ ४६५८ जणांना लसीचा दुसरा डोस मिळाला आहे.
लसींचा पुरवठाच मुबलक होईना...
लस घेण्यासाठी नागरिक आतुर आहेत; मात्र जिल्ह्याला आवश्यक प्रमाणात लसींचा पुरवठा होत नाहीये. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात केवळ २६ टक्केच नागरिकांचे लसीकरण होऊ शकले आहे.