उस्मानाबाद : ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण कायम ठेवण्याच्या मागणीसाठी समता परिषद व ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या वतीने सोमवारी उस्मानाबाद येथे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी सोलापूर-धुळे महामार्ग रोखून जोरदार घोषणाबाजी केली.
प्रशासकीय पदोन्नतीमध्ये आरक्षण कायम ठेवावे व ओबीसीची जातनिहाय जनगणना करावी, या मागण्याही आंदोलकांनी लावून धरल्या आहेत. न्यायालयाच्या निकालामुळे ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. ते पुन्हा बहाल करण्यात यावे व तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नये, अशी मागणी आंदोलकांची आहे. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलक शुक्रवारी सोलापूर-धुळे महामार्गावर उतरले. उस्मानाबादकडे येणारा रस्ता रोखून धरल्याने वाहनांची गर्दी झाली होती. दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.
यावेळी समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष महादेव माळी, उपाध्यक्ष बिभिषण खुणे, प्रदेश सरचिटणीस आबासाहेब खोत, नंदू शिंदे, संतोष डोरले, प्रा. राजेंद्र खडबडे, दत्ता कांबळे, ओबीसी राजकीय आरक्षण बचाव समिती जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने, बहुजन योद्धा संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय शिंगाडे, तेली समाज युवक प्रदेशाध्यक्ष रवी कोरे, सचिन चौधरी, जिवा सेना जिल्हाध्यक्ष नामदेव वाघमारे यांच्यासह समाजबांधव आंदोलनात सहभागी झाले होते.