उस्मानाबाद : महाराष्ट्र शासनाने महा आवास अभियान अंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यास दिलेल्या उद्दिष्टपूर्तीमध्ये उस्मानाबाद जिल्हा मराठवाड्यात प्रथम आला आहे. याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनिलकुमार नवाळे व त्यांच्या चमुचे कौतुक केले.
महाराष्ट्र शासनाद्वारे राबविण्यात येत असलेल्या महा आवास अभियान ग्रामीण अंतर्गत राज्य पुरस्कृत विविध आवास योजनांकरिता उस्मानाबाद जिल्ह्यास १५ हजार २५१ घराचे उद्दिष्ट पूर्ण करावयाचे होते. रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकूल योजना अशा विविध योजनेंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांचा वारंवार पाठपुरावा करून प्रकल्प संचालक अनिलकुमार नवाळे तसेच जिल्हा स्तरावर व तालुका स्तरावरील काम करणारे सहाय्यक प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी, जिल्हा प्रोग्रामर, कार्यासन, डाटा एन्ट्री ऑपरेटर यांनी पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
तालुकास्तरावरील सर्व गटविकास अधिकारी यांच्या मार्फत होत असलेल्या या अभियानाच्या कामकाजाचा आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अध्यक्ष कार्यकारी समिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तसेच प्रकल्प संचालक यांनी बैठकांद्वारे घेतला होता. तसेच सर्व संबधित अधिकारी कर्मचारी यांनी याकामी व्यक्तिगत लक्ष दिल्याने १५ हजार २५१ पैकी १५ हजार ११ एवढे उद्दिष्ट पूर्ण करण्यास जिल्हा परिषदेला यश आले. उर्वरित २४० उद्दिष्ट लवकरच पूर्ण करण्याच्या अनुषंगाने योग्य ते नियोजन करण्यात आले आहे. याकामी अशोक काळे, संतोष चप्पलवार, मेघराज पवार, राम पवार, रविंद्र इरकल, महेश मगर यांनी सुटीच्या दिवशी व रात्री उशिरापर्यंत बसून अपेक्षेपेक्षा ही जास्त काम केल्याने फड यांनी त्यांचे कौतुक केले आहे.