लोकमत न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : पेट्रोलच्या किमती वाढल्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. तसेच खताच्या किमतीतही भरमसाठ वाढ केल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत आल्याचा दावा करत सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हाभर आंदोलन करण्यात आले. उस्मानाबादेतही पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
देशावर कोरोनाचे महासंकट घोंगावत असताना, केंद्र सरकारने खताच्या किमती भरमसाठ वाढवल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. १०:२५:२६ खताची किंमत ६०० रुपयांनी वाढवली आहे. डीएपीची किंमत ७१५ रुपयाने वाढवून १,९०० रुपये केली आहे. तसेच डिझेलच्या किमती वाढल्यामुळे ट्रॅक्टरद्वारे नांगरणी, कुळवणी व इतर मशागतीच्या किमतीमध्ये दुप्पट वाढ करण्यात आली आहे. शिवाय कृषीमाल वाहतुकीच्या दरातही वाढ झाल्याने शेतकऱ्यांना फटका बसत आहेच. मात्र, सर्वसामान्यांनाही हा माल जादा दराने विकत घ्यावा लागत आहे. पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. इतर सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीनेही उच्चांक गाठल्याने सर्वसामान्यांचा आर्थिक कणाच मोडल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी या सर्व बाबींची दरवाढ तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी लावून धरली. यावेळी केंद्र शासनाच्या धोरणाचा निषेधही नोंदविण्यात आला. दरम्यान, निदर्शने केल्यानंतर आपल्या मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्याकडे देण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, युवक जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे, विधानसभा अध्यक्ष अमित शिंदे, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, संजय निंबाळकर, संजय दुधगावकर, नगरसेवक खलिफा कुरेशी, बाबा मुजावर, गणेश खोचरे, बबलू शेख, सचिन तावडे, नंदकुमार गव्हाळे, ईस्माईल काझी, गौस तांबोळी, अमोल सुरवसे, खादर खान, राॅबिन बगाळे, अशोक पेठे, नितीन बागल, खलील पठाण, अभिजीत वटकर सहभागी झाले होते.