मुरुम : उमरगा तालुक्यातील केसरजवळगा येथील छटीकव्वा ते जुना अचलेर या रस्त्यावर अगोदरच काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले असून त्यातच आता सरपंच व काही शेतकऱ्यांनी मुरमाचे ढिगारे टाकून हा रस्ता गेल्या सहा दिवसांपासून अचानक बंद केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.
केसरजवळगा येथील छटीकव्वा ते जुना अचलेर या रस्त्याचा प्रश्न सध्या भूमिअभिलेक व तहसील कार्यालयात प्रलंबित आहे. मोजणी करुनच शेतरस्ता करावा, अशी काही शेतकऱ्यांची मागणी आहे. मोजणीचे पैसे कोण भरणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा प्रशासनानेच यावर तोडगा काढून शेतरस्त्याचा प्रलंबित प्रश्न सोडवावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
सदर रस्ता पिंढ्यान्पिढ्या असून, उत्तरेकडील शेतकऱ्यांनी पावसाचे पाणी ओढ्याला जाण्यासाठी चर मारुन पंधरा फुटी रस्ता सोडला आहे. उत्तरेकडील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी यात गेल्या आहेत. याच रस्त्यावरुन दक्षिणेकडील शेतकरीही ये-जा करतात. ओढ्याजवळील शेतकऱ्यांनी या रस्त्यावर अतिक्रमण केलेले आहे. ओढ्याच्या पलिकडे आलूर शिवारातील शेतकऱ्यांची शेती असून, तेथील काही शेतकऱ्यांनीही शेतरस्त्यावर अतिक्रमण केले आहे. गेल्या अनेक वर्षापासूनच रस्ता खुला करुन शेतरस्ता करावा, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांकडून सातत्याने केली जात आहे. मागील वर्षी या शेतरस्त्यासाठी निधी मंजूर झाला होता. मातीकामही सुरु झाले होते. मात्र, दोन्ही शेतकऱ्यांच्या सहमतीसाठी हे काम रखडले. मोजणीकरुनच शेतरस्ता पूर्ण करावा, अशी उत्तरेकडील शेतकऱ्यांची मागणी आहे. यासाठी सुरुवातीला अतिक्रमण काढाणे आवश्यक आहे. तर दक्षिणेकडील शेतकऱ्यांची आहे त्या रस्त्यावरच शेतरस्ता करण्याची मागणी आहे. याच वादात हे काम रखडले आहे.
प्रतिक्रिया........
छटीकव्वा ते जुना अचलेर रस्ता या रस्त्यावरील अतिक्रमण काढूनच आलूरच्या सीमेपर्यंत शेतरस्ता पूर्ण करणे गरजेचे आहे........ सरपंच बलभीम पटवारी यांनी शासनाची परवानगी नसतानाही अतिक्रमण न काढताच आहे त्या रस्त्यावर मुरमाचे ढिगारे टाकून रस्ता वाहतुकीस बंद केला आहे. वास्तविक भूमिअभिलेख व तहसील कार्यालयात रस्त्याचा हा प्रश्न प्रलंबित आहे.
- अय्युब इनामदार, शेतकरी, उत्तर बाजू
डिसेंबर २०२० मध्ये उमरगा तहसीलदारांकडे रस्ता खुला करुन शेतरस्ता करावा अशी मागणी केली आहे........ मंडळ अधिकाऱ्यांनी पंचनामा करून भूमिअभिलेख कार्यालकडे मोजणीसाठी तहसीलदारांना पत्र पाठवल्याचे कळविले. परंतु, याचा निकाल येण्यापूर्वीच शेतरस्त्याचे काम सुरु करुन वाद निर्माण झाल्याने सध्या शेतरस्त्याचे काम बंद झाले आहे.
- महादेव परिट, शेतकरी, दक्षीण बाजू
छटीकव्वा ते जुना अचलेर या पाणंद शेत रस्त्याचे काम व्हावे यासाठी शेतकरी गेल्या अनेक वर्षापासून मागणी करीत होते. एका बाजुचे शेतकरी आहे त्या रस्त्यावर शेतरस्त्याची मागणी करीत असून, दुसऱ्या बाजुच्या शेतकऱ्यांनी मोजणीनंतर शेतरस्ता करावा, अशी मागणी आहे. हा वाद मिटविण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न झाले. परंतु, याचा उपयोग झाला नाही. त्यामुळे सहा दिवसांपूर्वी गावातील काही ज्येष्ठ मंडळींसह शेतरस्त्याची पाहणी करुन दोन्ही बाजुच्या शेतकऱ्यांच्या सहमतीनंतर शेतकऱ्यांनीच शेतरस्त्यावर मुरम टाकला. हे काम नियमानुसारच केले जाईल.
- बलभीम पटवारी, सरपंच