उस्मानाबाद : मागील काही महिन्यांपासून आपण सर्वजण कोरोना संकटाशी सामना करत आहोत. या काळात प्रत्येकाने खारीचा वाटा उचलत काही कार्य सुरू केले असून, याचा प्रशासनाला नक्की फायदा होईल, असा विश्वास अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले यांनी व्यक्त केला.
उस्मानाबाद येथील भारत विद्यालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर जनकल्याण समितीचे जिल्हा कार्यवाह ॲड. श्रीकृष्ण मसलेकर, डॉ. सागर पाटील, डॉ. आकाश पाठक, डॉ. सय्यद परवीन, तसेच केंद्रात सेवा देणारे डॉक्टर्स उपस्थित होते.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत आपल्या जिल्ह्यात अपुऱ्या आरोग्य सुविधा असताना ही केवळ सर्वांच्या सहकार्यामुळे आपण त्यावर मात करू शकलो. आता दुसऱ्याला लाट वेळी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून उचललेल्या खारीच्या वाट्यामुळे सुविधांमध्ये वाढ झाली आहे. ज्या नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असताना घरात राहणे शक्य नाही त्यांच्यासाठी हा विलगीकरण कक्ष उपयुक्त ठरणार असून, जनकल्याण समितीने सुरू केलेल्या बालसंगोपन कक्षाचे ही काम महत्त्वाचे असल्याचे त्या म्हणाल्या.
यावेळी विद्या भारतीचे क्षेत्रीय पदाधिकारी शेषाद्री डांगे, ॲड. महेंद्र देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास डॉ. अभय शहापूरकर, भारत विद्यालयाचे मुख्याध्यापक गायकवाड, आयुर्वेद व्यासपीठाचे वैद्य प्रशांत कोथळकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉ. अजित नायगावकर, अमोल सूर्यवंशी, तेरणा इंजिनिअरिंगचे प्राचार्य माने आदी उपस्थित होते. आभार ॲड. सचिन सूर्यवंशी यांनी मानले.