कळंब : कृषी कार्यालयामार्फत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पेरणी यंत्रासाठी (बीबीएफ) अनेक शेतकऱ्यांनी प्रस्ताव दाखल करुन धनादेश देवूनही कृषी कार्यालयामार्फत पेरणी वाटप करण्यास विलंब लावला जात आहे. तालुका कृषी कार्यालयाने सदर पेरणी यंत्र तात्काळ वाटप करावेत, अशी मागणी खामसवाडी येथील पं.स. सदस्य अमोल पाटील यांनी केली आहे.अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले बी.बी.एफ. हे पेरणी यंत्र अनुदानावर शेतकऱ्यांना वाटप करण्याची योजना तालुका कृषी कार्यालयामार्फत राबविली जात आहे. यासाठी अनेक शेतकऱ्यांनी विहीत नमुन्यातील प्रस्ताव, १०० रुपयाच्या मुद्रांकावर प्रतिज्ञापत्र, लोकवाट्याचा धनादेश आदी कागदपत्रे कृषी कार्यालयाकडे सादर केले आहेत. अटींची पूर्तता करुनही काही शेतकऱ्यांना पेरणी यंत्र देण्यास कृषी विभागाकडून टाळाटाळ केली जात आहे. शेतकरी आपला कामधंदा सोडून कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. यासंदर्भात संबंधित कर्मचाऱ्यांची भेट अथवा संपर्क होत नाही. या सर्व प्रकारामुळे शेतकऱ्यांना प्रस्ताव दाखल करुनही अटींची पूर्तता करुनही शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. (वार्ताहर)...तर आंदोलनतालुका कृषी अधिकारी कार्यालयाने यासंदर्भात होणारा विलंब टाळून शेतकऱ्यांना तात्काळ पेरणी यंत्राचे वाटप करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा खामसवाडी येथील पंचायत समिती सदस्य अमोल पाटील यांनी दिला आहे. हे निवेदन कृषी विभागाला दिले आहे.
प्रस्ताव दाखल करूनही पेरणी यंत्र मिळेना !
By admin | Updated: July 8, 2014 00:59 IST