वाशी : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या वाशी फाटा ते कळंब रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे वाढली असून, प्रशासनाकडून दिलेल्या नोटिसीत आठ जूनची मुदत देण्यात आली होती. वास्तविक ही मुदत संपून आता महिन्याचा कालावधी लोटत असला तरी अद्याप ना अतिक्रमणधारकांनी स्वत:हून अतिक्रमणे काढली ना प्रशासनाने ती हटविली. त्यामुळे हा प्रश्न अद्याप ‘जैसे थे’ आहे.जिल्ह्यात अनेक ठिकाणी छोट्यामोठ्या व्यावसायिकांसह धनदांडग्यांनीही सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमणे करून वाहतुकीस अडथळे निर्माण केले होते. मध्यंतरी उस्मानाबाद, भूम, परंडा, कळंब, शिराढोण आदी ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ही अतिक्रमणे हटविण्यात आली. वाशी येथील ३९ अतिक्रमणधारकांनाही सार्वजनिक बांधकाम विभागाने नोटिसा बजावून आठ जूनपर्यंत अतिक्रमणे काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु, अद्यापही याबाबत कार्यवाही झालेली नाही.सध्या शहरातील ग्रामीण रूग्णालय, जुन्या बसथांब्यावर, पारा चौकासह आदी ठिकाणी अतिक्रमणे आहेत. यामुळे वाहतुकीस कोंडी निर्माण होत असून विद्यार्थी, महिलांसह वाहनचालकांनाही या रस्त्यावरून जातना कसरत करावी लागत आहे. त्यातच अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला दुचाकी लावल्या जात असल्याने रस्ते अरूंद झाले आहेत. या अतिक्रमणांबाबत येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केवळ कागदी घोडे नाचवून आपली जबाबदारी तहसीलसदारांच्या खांद्यावर टाकली आहे. ग्रामपंचायतीचेही याकडे दुर्लक्षच असल्याचे दिसते.याबाबत तहसीलदार रामेश्वर गोरे यांना विचारणा केली असता येत्या आठवडाभरात अतिक्रमणे हटविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. तसेच जे स्वत:हून अतिक्रमण हटवणार नाहीत त्यांच्यावर पोलिस कारवाही करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. (वार्ताहर)
‘डेडलाईन’ संपूनही अतिक्रमणे ‘जैसे थे’
By admin | Updated: July 3, 2014 00:19 IST