उस्मानाबाद : एकीकडे सर्वसामान्य जनता, शेतकरी कोरोना संकटाचा सामना करीत असताना दुसरीकडे केंद्र शासनाने पेट्रोल, डिझेल या इंधनांसह खतांच्या किमतीतही भरमसाठ वाढ केली आहे. यामुळे बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे शासनाने ही दरवाढ तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने करीत प्रशासनामार्फत पंतप्रधानांना निवेदन पाठविण्यात आले.
देशावर कोरोनासारखे महासंकट ओढवले असताना मोदी सरकारने खताच्या किमती दुपटीने वाढवून शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आणली आहे. डिझेलच्या किमती वाढल्यामुळे ट्रॅक्टरद्वारे नांगरणी, मोगडणी, कुळवणी इत्यादी मशागतीच्या कामाचे दरही वाढले आहेत. तसेच कृषी माल वाहतुकीच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ झाल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. पेट्रोलच्या किमतीनेही शंभरी पार केली आहे. त्यामुळे इतर सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीने उच्चांक गाठल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. त्यामुळे केंद्र शासनाने खताच्या वाढीव किमती त्वरित रद्द कराव्यात व इंधन दरवाढीला लगाम घालावा, अन्यथा पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.