उस्मानाबाद : कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनापासून सुरक्षेसाठी शासनाने लसीकरण मोहीम राबविली जात आहे. ४५ वर्षापुढील वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणानंतर आता १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना लस दिली जाणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात या वयोगटातील व्यक्तींना सोमवारपासून लस दिली जाणार आहे.
१६ जानेवारीपासून जिल्ह्यास लसीकरण मोहीमेस सुरुवात झाली आहे. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईनवर्करनंतर १ मार्चपासून ६० वर्षापुढील नागरिक तसेच ४५ वर्षापुढील दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींच्या लसीकरणास प्रारंभ झाला. १ एप्रिलपासून ४५ वर्षापुढील नागरिकांना लस टोचली जात आहे. मात्र, मागील तीन महिन्यापासून १८ ते ४४ वयोगटातील कमावता वर्ग कामानिमित्त घराबाहेर राहत असल्याने बाधित होण्याचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे संसर्गाचा धोकाही वाढत आहे. त्यामुळे १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना लस देण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यानुषंगाने केंद्र शासनाने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना १ मेपासून लस देण्याची घोषणा केली आहे. राज्य शासनाकडून लस प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यात सोमवारपासून या वयोगटातील व्यक्तींना लस देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने आरोग्य विभागाकडून लसीकरणासाठी उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालय, तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय, उमरगा उपजिल्हा रुग्णालय, कळंब उपजिल्हा रुग्णालय व परंडा उपजिल्हा ही पाच लसीकरण केंद्र निश्चित करण्यात आली आहे. या रुग्णालयातील केंद्रावरुन दररोज प्रत्येकी दोनशे लाभार्थ्यांना लस दिली जाणार आहे.
कोट...
लस घेण्यापूर्वी नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी लागणार आहे. ज्यांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केलेली आहे आणि त्याच दिवसाचा स्लॉट बुक केला आहे. अशाच व्यक्तींचे लसीकरण केले जाईल. त्यामुळे ज्यांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केलेली नाही. त्यांनी केंद्रावर जाऊन गर्दी करु नये.
डॉ. कुलदीप मिटकरी, लसीकरण अधिकारी