उस्मानाबाद : जिल्ह्यातील ३८२ ग्रामपंचायतींचा निकाल साेमवारी जाहीर झाला. यापैकी १४० ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व प्रस्थापित केल्याचा दावा भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन भाेसले यांनी केला आहे.
राज्याप्रमाणेच जिल्ह्यातही शिवसेना, राष्ट्रवादी तसेच काँग्रेस या तीन पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकत्र येत महाआघाडी करून ग्रामपंचायतींच्या निवडणुका लढविल्या. भाजपने या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीस जाेरदार टक्कर देत १४० ग्रामपंचायतींवर वर्चस्व प्रस्थापित केले. संरपचपदाचे आरक्षण आणखी जाहीर हाेणे बाकी आहे. हे आरक्षण जाहीर झाल्यानंतर या संख्येत आणखी भर पडेल. भाजप आमदार राणाजगजीतसिंहजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली व प्रदेश सरचिटणीस आ. सुजीतसिंहजी ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्याचेच हे फळ असल्याचे जिल्हा सरचिटणीस नितीन भाेसले यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.