उस्मानाबाद : मराठा आरक्षणाची कायदेशीर लढाई महाविकास आघाडी सरकारने योग्य पद्धतीने हाताळली नाही. आता हे आरक्षण मिळविण्यासाठी समाजाकडून जी आंदोलनात्मक पावले उचलली जातील त्यात भाजपाचा जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकर्ता पक्षाची ओळख बाजूला ठेवून सहभागी होईल, अशी माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी सोमवारी दिली. मराठा समाजाला नोकरीत व शिक्षणात आरक्षण मिळवून देण्याचे महत्त्वाचे काम तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केले होते. योग्य ती घटनात्मक कार्यवाही करून हे आरक्षण दिल्यामुळे उच्च न्यायालयात व नंतर सर्वोच्च न्यायालयातही आरक्षण कायम राहिले. महाविकास आघाडी सरकारच्या अकार्यक्षम हाताळणी मुळे आता आरक्षणासंदर्भात मराठा समाजाला नव्याने आंदोलन करण्याची वेळ आली आहे. समाजाच्या नावाने व नेतृत्वात जी आंदोलने होतील त्यामध्ये भाजपा पक्षीय ओळख बाजूला ठेवून सहभागी होईल, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले आहे. आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेपर्यंत हा लढा सुरु ठेवण्याचा भाजपाचा निर्धार असल्याचे आ. पाटील यांनी म्हटले आहे. मराठा समाजास आरक्षण देण्याची आघाडी सरकारची मानसिकता नसल्याने आघाडी सरकारने मराठा समाजाची घोर फसवणूक केली आहे, हे सर्वोच्च न्यायालयाचे निकालपत्र वाचल्यावर उघड होते. राज्यातील मागासवर्गीय आयोगाची मुदत संपल्यानंतर नवा आयोग स्थापन करण्यात ही महाविकास आघाडी सरकार चालढकल करत असून, यावरून आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारची नकारात्मक मानसिकता स्पष्ट होत असल्याचाही आरोप आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केला आहे.
मराठा आंदोलनात भाजपाचाही सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:33 IST