उमरगा : आपण बुद्धांचे पाईक आहोत. बुद्धांच्या विचाराचे आचरण करणे गरजेचे आहे. स्वतःला सिद्ध करा. स्वतःच्या हिंमतीवर जगा. सरकारच्या कित्येक योजना दलितांसाठी हितकारक असून, या योजनेचा लाभ घेऊन स्वावलबी बना. कोरोना काळात पोलिस व आरोग्य कर्मचाऱ्यांनी मोठे काम केले आहे. त्यांचा आदर करा, असे आवाहन केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी केले.
उमरगा तालुक्यातील कराळी येथील बुद्ध विहार परिसरातील सभागृहाचे उद्घाटन, डांबरी रस्त्याचा लोकार्पण सोहळा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमासाठी जि. प. अध्यक्ष अस्मिता कांबळे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष कैलास शिंदे, समाजकल्याण सभापती दिग्विजय शिंदे, माजी जि. प. सदस्य दिलीप भालेराव, जि. प. चे माजी अध्यक्ष शिवदास कांबळे, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हळ, राजाभाऊ सरवदे, माजी आमदार दयानंद गायकवाड, रिपाइंचे तालुकाध्यक्ष सुभाष सोनकांबळे, विलास खिल्लारे, मच्छिंद्र सरपे, चंद्रकांता सोनकांबळे, धनंजय शिंगाडे, राम गायकवाड आदी उपस्थित होते.
आठवले म्हणाले, सर्वांनी धम्माचा आदर करावा. मनातला अहंकार दूर करावा. बाबासाहेबांनी दिलेल्या बुद्ध धम्माला तळहातावरच्या फोडागत सांभाळा. गट-तट असले तरी तेही आपलेच मानून त्यांना सोबत घेऊन चला. सर्वसामान्य गोरगरीब जनतेची कामे करा. कार्यकर्ते तयार करा. मी आलो म्हणून गर्दी करू नका. गर्दीचे मतदानात रूपांतर करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी कराळी बुद्ध विहाराच्या उर्वरित कामासाठी दुसरा निधी लवकरच देऊ, असे आश्वासन देऊन बुद्ध विहार कामाचे त्यांनी कौतुक केले. कार्यक्रमासाठी उस्मानाबाद, लातूर, सोलापूर जिल्ह्यांसह कर्नाटक राज्यातून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सुधीर कांबळे यांनी केले. विलास खिल्लारे यांनी प्रास्ताविक, तर मच्छिंद्र सरपे यांनी आभार मानले.