कळंब : रस्त्याच्या कामाने नालीचा प्रवाह बंद केल्यामुळे थोड्याशा पावसाने बसस्थानक आवारात पाण्याची डबकी साचत असून, याचा प्रवाशांसह स्थानक परिसरातील व्यावसायिकांना देखील मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात संबंधितानी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे
कोरोनामुळे अनेक महिने निर्मनुष्य असलेल्या कळंब बसस्थानक परिसरात सध्या प्रवाशांची चांगलीच वर्दळ दिसून येत आहे. जागेवर ठप्प असलेल्या लालपरीची चाके धावू लागल्याने कळंब आगारात हजारो प्रवाशांची दररोज ये-जा चालू असते. यामुळे कर्मचारी, स्थानक आवारातील व्यावसायिक यांच्यातून समाधान व्यक्त केले जात आहे. एकीकडे असे सुखद चित्र असतानाच दुसरीकडे मात्र यंदा स्थानक व आगाराचे ‘एंट्री पॉईंट’ असलेल्या उजव्या बाजूस थोड्याशा पावसाने चिखलमय पाण्याची डबकी साचत आहेत. पाण्याच्या डोहातून दुर्गंधी पसरत आहे. यामुळे स्थानक आवारात येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांसह नागरिकांना याचा त्रास तर सहन करावा लागत आहेच, शिवाय परिसरातील व्यावसायिक त्रासून गेले आहेत. असे असताना ही नाली प्रवाही करण्याचे, पाण्याचे डोह कमी करण्याची नेमकी जबाबदारी कोणाची? याचे कोडे उलगडत नसल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
चौकट...
राष्ट्रवादी काँग्रेसची आग्रही मागणी
दरम्यान, यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. श्रीधर भवर यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांची भेट घेऊन संबंधित एजन्सीला नाली ब्लॉक झाल्याने पाणी स्थानक आवारात येऊ नये यासंबंधी सूचना द्याव्यात, अशी मागणी केली. यावेळी पं. स. उपसभापती गुणवंत पवार, तालुका उपाध्यक्ष रमेश देशमुख, राष्ट्रवादी वक्ता प्रशिक्षण विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुशील शेळके, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भीमराव हगारे, राष्ट्रवादी युवकचे सचिव मनोज शिदे, सौरभ मुंडे, रोहन देशमुख, आदी उपस्थित होते.
ठेकेदाराची बेफिकिरी
कळंब बसस्थानकाच्या समोरील भागातून खामगाव-पंढरपूर महामार्ग जातो. याचे काम कायम ‘प्रगतिपथावर’ असते. हे काम करत असताना स्थानकासमोरच्या मोठ्या नालीला अडथळा झाला आहे. यामुळे मोठ्या नालीचे पाणी तटून ते स्थानक आवारात घुसत आहे. यामुळेच कळंब बसस्थानकाची दैना झाली असल्याचे स्थानिक व्यावसायिक सांगत आहेत. यासंदर्भात फेब्रुवारी व जुलै महिन्यांत दोनवेळा पत्र देऊन संबंधितांना अवगत केले आहे, असे आगार प्रमुख मुकेश कोमटवार यांनी सांगितले.