उस्मानाबाद : मागील दोन महिने लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद होती. तसेच भाजीपाल्याची विक्रीही सकाळी ११ वाजेपर्यंत सुरू होती. आता अनलॉकनंतर बाजारपेठ पूर्वपदावर येत असून, भाजी मंडईतही व्यापारी व शेतकरी भाज्या विक्रीस घेऊन येत आहेत. सध्या खरीप हंगामाच्या पेरणीमुळे शेतकरी खरिपातील पिके घेण्यावर भर देत आहेत. त्यामुळे पालेभाज्यांचा तुडवडा निर्माण झाला आहे. परिणामी, भाजीपाला २५ टक्क्यांनी महागला आहे. तर पालेभाज्यांच्या किमती दुपटीने वाढल्याचे चित्र बाजारात पाहावयास मिळत आहे.
मार्च महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली. त्यामुळे प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे आठवडी बाजार अद्यापही बंदच आहेत. मात्र, नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी फळ मार्केट व भाजी मंडई दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा दिली आहे. बाजारात मागणीच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक मंदावली आहे. त्यामुळे मेथी, शेपू, चुका, पालक या भाज्यांच्या जुड्यांचे दर दुपटीने वाढले आहेत. शिवाय, शेवग्याचाही तुटवडा निर्माण झाल्याने शेवगा १२० रुपये प्रतिकिलोने विक्री होत आहे. वांगी, कारले प्रत्येकी १०० रुपये किलोने विक्री होत आहेत. तर टोमॅटो, लसूण, कांद्याचे दर स्थिर आहेत.
भाजीपाल्याचे दर
भाजीपाला १ जून २१ जून
दोडका ८० ७०
कारले १०० ८०
टोमॅटो २५ २५
वांगी १०० १००
भेंडी ८० ७०
गवार ८० ६०
भेंडी ६० ६०
हिरवी मिरची ६० ६०
शिमला मिरची ८० ६०
फ्लॉवर ८० ६०
मेथी २५ १५
पालक २० १०
शेपू २० १०
चुका २० १०
पुन्हा वरणावर जोर
लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या अनलाॅकनंतर बाजारपेठ सुरळीत सुरू झाल्या आहेत. मात्र, पालेभाज्यांचे दर दुपटीने वाढले आहेत. त्यामुळे पुन्हा वरणावर भर दिला आहे.
- प्रतिभा हावळे, गृहिणी
लॉकडाऊन काळात फळभाज्या व पालेभाज्या हातगाड्यांवर सहज मिळत होत्या. त्यावेळी भाज्यांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात होते. अनलॉकनंतर मेथी, शेपू, चुका, पालक पालेभाज्या महागल्या आहेत. त्यामुळे फळभाज्यांची खरेदी करावी लागत आहे.
- महानंदा भोसले, गृहिणी
शेतकऱ्याच्या पदरी निराशाच
शेतात अर्धा एकर कारल्याची लागवड केली होती. त्यासाठी ४० हजार रुपये खर्च झाला. लॉकडाऊनमुळे बाजार बंद होते. तसेच पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे वाहनांचा खर्च वाढला आहे. अर्धा एकरात ८० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. सुरळीत बाजार असता तर एक ते दीड लाख रुपये उत्पन्न मिळाले असते.
- दत्ता माळी, शेतकरी, काजळा
अर्धा एकर क्षेत्रावर हिरवी मिरचीची लागवड केली होती. लागवडीसाठी २० हजार रुपये खर्च झाला. मात्र लाॅकडाऊनमुळे बाजार बंद असल्यामुळे मिरची मोडून सोयाबीन लावले आहे. मिरची लागवडीत २० हजार रुपयांचे नुकसान झाले.
- नामदेव घोडके, शेतकरी, बरमगाव बु.