कळंब : बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या अंगणवाड्यातील ‘निर्जळी’ आता दूर होणार असून, जलजीवन मिशनच्या माध्यमातून या अंगणवाड्यांना नळजोडणी देण्यासाठी ‘मिशनमोड’ कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. याद्वारे तालुक्यातील १८९ अंगणवाड्या थेट नळयोजनेशी ‘कनेक्ट’ झाल्या आहेत.
महिला व बालकल्याण विकास विभागाच्यावतीने शून्य ते सहा वयोगटातील बालकं, स्तनदा माता, गरोदर माता, किशोरवयीन मुली यांच्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. यात शिक्षण ते आरोग्यवर्धन, मार्गदर्शन ते सुपोषण यावर भर दिला जातो. यासाठी अंगणवाडी, मिनी अंगणवाडी कार्यान्वित असून, त्यामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस कार्यरत आहेत. बालक, माता, मुली यांच्यासाठी महत्वाच्या असलेल्या या अंगणवाड्या गावातील मोकळ्या जागेत, विरळ वस्ती भागासह वाडी अन् वस्तीवर आहेत. यामुळेच तेथे बहुधा पिण्याच्या किंवा सांडपाण्याची सोय उपलब्ध नसते.
यामुळे याठिकाणी पोषण आहार घेतला तर पाणी प्यायचे कुठले, असा प्रश्न पडत असे. यास्थितीत केंद्राच्या जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक अंगणवाडीत पाण्याची सोय करण्याचा महत्वाचा असा कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी राहुल गुप्ता याच्या प्रगतीवर दररोज विशेष लक्ष ठेवून आहेत.
चौकट...
निर्जळी झाली दूर
तालुक्यात एकूण १८९ अंगणवाड्या आहेत. यापैकी बहुतांश अंगणवाडीमध्ये पाण्याची सोय नव्हती. नळयोजनेशी जोडले न गेल्याने पाण्याची कायम ‘निर्जळी’ असे. यामुळे एकात्मिक बालविकास विभागाने जल जीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक अंगणवाडीमध्ये पाण्याची सोय होईल, यावर विशेष भर दिला. यासंबंधी ग्रामपंचायत व सर्व शिक्षा अभियान यांच्याकडे आपली गरज नोंदवली. आजच्या स्थितीत यापैकी १८९ अंगणवाड्या नळयोजनेशी कनेक्ट झाल्या आहेत, असे बाल विकास प्रकल्प अधिकारी वैशाली सांगळे यांनी सांगितले.
हजारो बालकांना होणार फायदा...
तालुक्यातील २४९ पैकी १८९ अंगणवाड्यात पाण्याची सोय करण्यासाठी उपक्रम राबवण्यात आला आहे. तालुक्यात शून्य ते सहा वयोगटातील एकूण १५ हजार बालके अंगणवाडीच्या पटावर आहेत. यातील बहुतांश बालकांना आता पाणी उपलब्ध होणार आहे. नाईकनगर, महादेवनगर, गायरानवस्ती, काळदाते वस्ती अशा अनेक वस्तींना नळ जोडणी दिली आहे. यासाठी काहींना पोषण अभियानातून तर काहींना पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून आधार मिळाला आहे.