उस्मानाबाद : राज्यातील आरोग्य विभागाची यंत्रणा आणखी बळकट करण्यासाठी १७ हजार पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातील ८५०० पदांची जाहिरात उद्याच येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी कळंब येथे दिली.
राजेश टोपे हे रविवारी विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने उस्मानाबाद जिल्ह्यात होते. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, कोरोनाच्या काळात आरोग्य सेवेतील डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. आरोग्य यंत्रणाही यानिमित्ताने बळकट करता आली. मात्र, अजूनही मनुष्यबळाची निकड या विभागास असल्याचे लक्षात आले. ही गरज पाहून आरोग्य विभागात १७ हजार पदे भरण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यातील क व ड दर्जाची पदे आधी भरली जाणार आहेत. ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून ही पदे भरतानाच उर्वरित पदे ही सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून लवकरच भरली जातील. दरम्यान, पहिल्या टप्प्यातील ८५०० पदांची जाहिरात उद्याच येत असल्याचेही राजेश टोपे म्हणाले.
चौकट.........
शहरांच्या नामांतराच्या मुद्यावर बोलताना ते म्हणाले, आमच्यासाठी हा विषय महत्वाचा नाही. आमचे प्राधान्य विकासकामांना आहे. नंतर बाकीच्या गोष्टी. जर असा काही निर्णय घ्यायचाच असेल तर तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते एकत्र बसून याविषयी ठरवतील.