रऊफ शेख
फुलंब्री : मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत तालुक्यातून दोन सभापती मिळाल्याने राजकीय पटलावर तालुक्याचे वजन आहे. मात्र, या सभापतींना आगामी ग्रामपंचायतीच्या आखाड्यात आपल्या गटातील निवडणुका जिंकण्यासाठी कस लागणार आहे. फुलंब्री तालुक्यात १५ जानेवारीला ५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान होणार असून निवडणूक प्रक्रिया सुरू आहे.
ग्रामपंचायतीच्या या रणसंग्रामात सध्या प्रत्येक गावात निवडणुकीचे वातावरण तापले असून पॅनल तयार करण्यासाठी गावातील पुढारी, कार्यकर्ते व्यस्त असल्याचे चित्र आहे. आपल्या गटातील ग्रामपंचायती कशा प्रकारे आपल्याच ताब्यात येतील, याकडे जिल्हा परिषद सदस्य तथा सभापती जोमाने कामाला लागलेले आहेत. या सभापतीचे येणाऱ्या काळातील भवितव्य या निवडणुकीवर अवलंबून असल्याने संबंधितांनी आपला मोर्चा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे वळवला आहे.
---------------
बांधकाम सभापती किशोर बलांडे हे वडोद बाजार गटाचे सदस्य असून २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत अवघ्या २९९ मतांनी निवडून आले होते. जिल्हा परिषदेत ते बांधकाम सभापती म्हणून कार्यरत आहेत. त्याच्या गटातील १४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका असून बोरगाव अर्ज, वडोद बाजार, जळगाव मेटे, महालकिन्होला या महत्त्वाच्या ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी त्यांची कसोटी लागणार आहे.
--------------
महिला व बालकल्याण सभापती अनुराधा चव्हाण या गणोरी गटाचे प्रतिनिधित्व करतात. गेल्या निवडणुकीत त्या विक्रमी ५१८६ मतांनी निवडून आल्या होत्या. त्या सध्या जिल्हा परिषदेत महिला व बालकल्याण सभापती असून त्यांच्या गटात १३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत. यात गणोरी, किनगाव, वारेगाव, वाणेगाव, पिंपळगाव वळण, शिरोडी या
प्रमुख ग्रामपंचायतींसाठी चुरस असेल.
-------------
फुलंब्री तालुक्यातील दोन जिल्हा परिषद सभापती यांच्या गटातील दहा ग्रामपंचायती महत्त्वाच्या असून संबंधित निवडणुका अंत्यत अटीतटीच्या होणार असल्याचे चित्र आहे. आपल्या पॅनलमधील उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सभापती याची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. कारण ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेले सदस्य, सरपंच हे जिल्हा परिषद निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने आगामी निवडणुका महत्त्वाच्या ठरणार आहेत.
-------------
गटातील सर्वच १३ ग्रामपंचायत निवडणुकांची प्रक्रिया सुरू असून नामनिर्देशनपत्र भरण्यास सुरुवात झाली आहे. निवडणूक जिंकण्यासाठी पॅनलमध्ये सक्षम उमेदवारास प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे गटातील सर्वच ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे महिला व बालकल्याण सभापती अनुराधा चव्हाण यांनी स्पष्ट केले.