अशोक कारके , औरंगाबाद महिलांच्या विकासासाठी राज्य शासनाने स्थापन केलेले महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा कार्यालय शोधणे म्हणजे फार मोठे दिव्य बनले आहे. यामुळे अनेक योजनांची माहिती लाभार्थींपर्यंत पोहोचतच नाही. २४ फेबु्रवारी १९७५ रोजी महिलांच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी हे महामंडळ स्थापन झाले. ग्रामीण भागातील महिलांना योजनांची माहिती मिळावी या उद्देशाने जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यालये उभारली; पण कार्यालय सापडता सापडत नसल्यामुळे निराश होऊन महिला व पुरुष परत जातात. कार्यालय अडगळीत असल्याने २१ मार्च ते २१ मे २०१४ या दोन महिन्यांत कार्यालयात योजनांची माहिती घेण्यासाठी फक्त तीन जणच येऊ शकले. कार्यालयात नेहमीच शुकशुकाट असल्यामुळे अधिकारी व कर्मचारी कार्यालयात गप्पा मारीत असतात. कार्यालय अडगळीला का? शहरात मोक्याच्या ठिकाणी अनेक जागा मोकळ्या असूनही कार्यालय अडगळीला का? ते भाडेतत्त्वावर घेतले आहे का? अधिकार्यांनी स्वत:च्या मर्जीतील लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळावा व त्याचबरोबर त्यांचे काम करून देऊन स्वत:चाही फायदा करून घेण्यासाठी कार्यालय मुद्दामच अडगळीला घेतले आहे का? असे प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. माहितीपत्रकावरच पत्ता नाही महामंडळाच्या माहिती पत्रकावर कार्यालयाचा पत्ता नसल्यामुळे माहितीपत्रकाचा काही उपयोग नाही. कार्यालयातील माहितीपत्रक राज्य मुख्यालयाचे असल्यामुळे त्याच्यावर औरंगाबादेतील कार्यालयाचा पत्ता नाही, असे कारण सांगितले जाते. जिल्ह्याची माहिती नाही, संकेतस्थळावरून माहिती पत्रक घ्या, असे कार्यालयात सांगितले जाते. नागरिक त्रस्त, अधिकारी मस्त कार्यालयाचा शोध घेताना महिला व पुरुष अतिशय त्रस्त होतात. कार्यालयात डोक्याला ताप देणारे नागरिक जास्त प्रमाणात येत नाहीत म्हणून अधिकारी मस्त आहेत. येथे आहे कार्यालय प्रणव प्लाझा बिल्डिंग, पहिला मजला, भाजीमंडी, औरंगपुरा
महिला आर्थिक विकास महामंडळ लाभार्थींपासून दूर
By admin | Updated: May 23, 2014 01:05 IST