औरंगाबाद : ‘जो बोले सो निहाल, सत्श्री अकाल,’ असा गगनभेदी जयघोष करीत सिंधी कॉलनी येथील गुरुद्वारापासून निघालेल्या शोभायात्रेने (नगर कीर्तन) सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जागोजागी पंचप्यारे यांचे पाय धुतले जात होते व पुष्पहार अर्पण करून त्यांचे स्वागत केले जात होते. आबालवृद्ध तलवारबाजी व अन्य मर्दानी खेळांचे चित्तथरारक प्रात्यक्षिक दाखवीत होते. प्रसंग होता, शिखांचे नववे गुरूश्री गुरूतेगबहादूर यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी सायंकाळी निघालेल्या शोभायात्रेचा. सिंधी कॉलनी येथील गुरुद्वारा श्री गुरू तेगबहादूर लंगर साहिब येथे सकाळपासूनच भजन व कीर्तनाला सुरुवात झाली होती.सायंकाळी गुरुद्वारा समितीचे अध्यक्ष जगदेवसिंग गुरुदत्ता यांनी गुरुद्वारातून गुरुग्रंथ साहिब डोक्यावर घेऊन बाहेर आले, तेव्हा जयघोष करण्यात आला. अग्रभागी बँड पथकातील कलाकार विविध धार्मिक व देशभक्तीपर गीते सादर करीत होते.पंचप्यारे भाई गुरू बच्चनसिंग फौजी, भाई दर्शनसिंग दख्खन, भाई मनजितसिंग कानसा, भाई सदबीरसिंग बिंद्रा, भाई अमोलकसिंग लाखवाले तसेच त्यांच्यामागून निशाणची साहेबान हाती घेऊन भाई भागेंदरसिंग कानसा व भाई बलदेवसिंग खालसा चालत होते.भाई साहेब भाई दयासिंगजी सेवक जथा धार्मिक गीत सादर करीत होते. शोभायात्रा सिंधी कॉलनी येथून निघून, मोंढानाका चौक, अमरप्रीत चौक, क्रांतीचौकमार्गे उस्मानपुरा येथील गुरुद्वारा येथे पोहोचली. शोभायात्रा यशस्वीतेसाठी गुरुद्वारा समितीचे इंदरजितसिंग छाबडा, रणजितसिंग गुलाटी, गुरुविंदरसिंग टुटेजा, हरविंदरसिंग सलुजा, शरणजितसिंग छाबडा, अवतारसिंग सौधी, गुरुजितसिंग छाबडा, जसपालसिंग मखिजा, मनजितसिंग दुमडा आदींनी परिश्रम घेतले.
जो बोले सो निहाल, सत्श्री अकाल...
By admin | Updated: April 28, 2016 00:19 IST