सुनील घोडके, खुलताबाद ‘प्रेमस्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलावू तुज आता मी कोणत्या उपायी’ या कवितेप्रमाणेच हृदयद्रावक घटना तालुक्यातील मावसाळा गावी घडली. मावसाळा गाव परिसरात सोमवार, दि. १९ रोजी सायंकाळी एका मादी जातीच्या वानराचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी मृत वानराजवळ तिचे एक महिन्याचे पिल्लू खेळत असताना दिसले; परंतु त्या पिल्लास आपली आई जग सोडून केव्हाच निघून गेल्याची पुसटशी कल्पना नव्हती. ग्रामस्थांनी मृत वानराचा अंत्यसंस्कार करण्याची तयारी केली; परंतु पिल्लू त्या वानराजवळ कुणालाही येऊ देईना, त्यामुळे ग्रामस्थांनी याबाबतची माहिती खुलताबाद वनविभागास दिली. वनरक्षक प्रशांत निकाळजे, वनमजूर एन.बी. मालोदे, मजीद गुलाब पटेल हे मावसाळा गावी आले व मृत वानरास व पिल्लास एका रिक्षामध्ये खुलताबाद येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात आणले. रिक्षातच असलेल्या वानराच्या मृतदेहाशेजारी बसत लहान पिल्लू दूध पिण्यासाठी आईजवळ जात होते; परंतु दूध येईना म्हणून जोरजोराने ओरडत होते. वनविभागाच्या कर्मचार्यांनी व ग्रामस्थांनी एका भांड्यात दूध व चपाती दिली तरी हे लहान पिल्लू त्यास तोंड लावेना; मात्र आईच्या दुधासाठी त्याची धडपड सुरूच होती; पण दूध मिळत नसल्याने समोर उभ्या असलेल्या लोकांवर लहान पिल्लू ओरडत होते. बघणार्यांना आईचे पे्रम, माया, वात्सल्य काय असते याचा प्रयत्य आला. मृत वानराची पशुधन विकास अधिकारी बी.आर. कांबळे यांनी उत्तरीय तपासणी केली, तर वनरक्षक प्रशांत निकाळजे, एन.बी. मालोदे, मजीद पटेल यांनी अंत्यसंस्कार केले व लहान पिल्लास दौलताबाद किंवा औरंगाबाद येथील वनविभागाच्या उद्यानात सोडणार असल्याचे सांगितले. हृदयद्रावक प्रसंग पाहून उपस्थिांच्या डोळ्यात अश्रू तरळले. आईचे प्रेम हे जगात श्रेष्ठ असल्याचे त्यांनी बोलवून दाखविले. (वार्ताहर)
बोलावू तुज आता मी कोणत्या उपायी!
By admin | Updated: May 21, 2014 01:10 IST