औरंगाबाद : महापालिकेतील महत्त्वाच्या पदांवर २०१० पासून ‘पश्चिम’ विधानसभा मतदारसंघाचाच पगडा राहिलेला आहे. ६ जून रोजी होणार्या सभापती निवडणुकीत आपल्याच मतदारसंघातील नगरसेवक विजयी व्हावा यासाठी ‘पश्चिम’ने पुन्हा जोर लावण्यास सुरुवात केली आहे. मागील ४ वर्षांत मनपातील सर्वाधिक दालने ‘पश्चिम’ मतदारसंघाने बळकाविली आहेत. यावेळी पद मागण्यामागे कारणही तसेच आहे. लोकसभा निवडणुकीत ‘पश्चिम’ने शिवसेना उमेदवाराला मोठे मताधिक्य दिले आहे. ते मताधिक्य आमदार व पदाधिकार्यांनी कडक उन्हात घेतलेल्या परिश्रमांमुळे मिळाल्याचा दावा केला जात आहे. मध्य मतदारसंघातील नगरसेवक जगदीश सिद्ध यांना सभापतीपद देण्यासाठी सर्व नेत्यांनी शब्द दिला आहे. त्यामुळे ते पदावर दावा करीत आहेत, तर ‘पश्चिम’ मतदारसंघाचे आ. संजय शिरसाट यांचे समर्थक नगरसेवक विजय वाघचौरे यांचे नाव अचानक पुढे आले आहे. कारण बालाजीनगरचे नगरसेवक त्र्यंबक तुपे यांना गेल्या पंचवार्षिकमध्ये सभापतीपद देण्यात आले होते. त्यामुळे त्यांना यावेळी संधी देताना त्याचा विचार होईल. आगामी विधानसभा आणि मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांना सोबत घेऊन चालणारा नगरसेवक सभापतीपदावर बसवावा, अशी मागणी युतीच्या गोटातून होत आहे. परंतु शिवसेनेच्या अंतर्गत गटबाजीमुळे सभापतीपदासाठी जबरदस्त रस्सीखेच सुरू आहे. ६ जून रोजी निवडणूक होणार आहे. अंदाजे ३ जूनपासून अर्ज दाखल करण्यासाठी सुरूवात होईल. या निवडणुकीवरून सेनेत गटबाजीला पुन्हा उधाण येऊ शकते. २०१० साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर ‘पश्चिम’ मतदारसंघात महापौरपद गेले. माजी महापौर अनिता घोडेले यांना ती संधी मिळाली. त्यानंतर सभागृहनेता गिरजाराम हाळनोर यांच्याकडे गेले. त्यानंतर त्र्यंबक तुपे व राजू वैद्य सभागृहनेता झाले, तर गटनेतापद गजानन बारवाल यांच्याकडे गेले. त्यानंतर सुशील खेडकर यांना सभागृहनेता केले. यावेळी सभापतीपदासाठी पुन्हा ‘पश्चिम’ने लॉबिंग सुरू केले आहे. त्या तुलनेत मध्य विधानसभा मतदारसंघातील नगरसेवक जगदीश सिद्ध हे औटघटकेचे सभापती झाले. नंतर विकास जैन सभापती झाले. स्थायी समिती सदस्यांव्यतिरिक्त आ. प्रदीप जैस्वाल समर्थकांना मनपात पद मिळाले नाही. आॅगस्ट २०१२ मध्ये आ. जैस्वाल सेनेत परतले. मात्र, त्यांच्या शहर प्रगती आघाडीला सेनेने स्वीकारलेले नाही. तसेच आ. जैस्वाल यांनादेखील सेनेतील गटबाजीचा सामना करावा लागत आहे. मध्य मतदारसंघातून सभागृह नेतेपदी किशोर नागरे यांची वर्णी लागेल, असे वाटले होते. मात्र, तो निर्णयही रखडला आहे. पूर्व मतदारसंघाला महापौर वगळता कुठलेही पद मिळालेले नाही.
मनपातील पदांवर ‘पश्चिम’चा पगडा
By admin | Updated: May 26, 2014 01:15 IST