गोळेगाव : सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव खुर्द येथे आठ ते दहा दिवसांनी नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे पाण्यासाठी नागरिकांचे मोठे हाल होत असून, ग्रामपंचायत प्रशासनाचा भोंगळ कारभार याला कारणीभूत ठरत आहे.
गोळेगाव खुर्द येथील जुई नदीच्या काठावर सार्वजनिक पाणीपुरवठ्याची विहीर आहे. सध्या जुई नदी खळखळ वाहत असून, विहिरीत मुबलक पाणीसाठा आहे. विहिरीशेजारी असलेला सिमेंट बंधारादेखील भरलेला आहे. मात्र, असे असतानाही गावात केवळ ग्रामपंचायत प्रशासनामुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीवर प्रशासक असून, त्यांचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याने कोणाकडे तक्रार करावी, याबाबत ग्रामस्थ संभ्रमित आहेत. गावात सलग दहा वर्षांपासून नागरिकांना पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. पाणी भरण्यासाठी गावातील महिलांना जळगाव-औरंगाबाद महामार्गाजवळील विहिरीवर जावे लागते. रस्ता ओलांडताना अपघात होण्याची दाट शक्यता आहे. प्रशासकाच्या ढिसाळ नियोजनामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.