औरंगाबाद : मराठवाड्यात ग्रामीण भागांसह शहरी भागांनाही यंदा हिवाळ्यात पाणीटंचाईचा फटका बसत आहे. नगरपालिका क्षेत्रात पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. प्रशासनाने आपत्कालीन पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. १० नगरपालिकांच्या हद्दीत जानेवारी २०१६ अखेर तीव्र पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे. विभागातील ५३ नगरपालिकेच्या पाणीटंचाईचा आराखडा नगरपालिका प्रशासन तयार करीत आहे. परभणी जिल्ह्यातील पूर्णा, सोनपेठ, नांदेड जिल्ह्यातील मुदखेडला जानेवारीमध्येच अतितीव्र तर जानेवारीनंतर गंगाखेड, कंधार, हदगाव, बिलोली, कुंडलवाडी, अर्धापूर, उदगीर, कळंब या नगरपालिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मार्चनंतर खुलताबाद, वैजापूर, अंबड, मानवत, देगलूर, धारूर, केज, गेवराई, औसा आणि उमरगा या नगरपालिकांना पाणीटंचाईच्या झळा बसणार आहेत. त्यादृष्टीने प्रशासन नियोजन करीत आहे. मराठवाड्यात ४५० गावे आणि २०२ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. मराठवाड्यात यावर्षी कमी पाऊस झाल्यामुळे आगामी काळात तालुक्यांना पाणीपुरवठा कसा करायचा, याबाबत नगरपालिका प्रशासनासमोर नियोजन करण्याचे मोठे आव्हान आहे.
१० नगरपालिकांच्या हद्दीत पाणीटंचाई
By admin | Updated: December 14, 2015 23:59 IST