बीड : इतरांच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र न पाहता डोळ्यात तेल घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वसाहतींची सुरक्षा पुरती धोक्यात आली आहे. कायद्याचे रक्षणकर्तेच मूलभूत सोयी- सुविधांना पारखे आहेत. पोलीस वसाहतींना समस्यांनी घेरले असून सांडपाणी घरांमध्ये शिरत असल्याने कुटुंबे मेटाकुटीला आली आहेत. तुटलेल्या दरवाजे व भिंतींना पडलेल्या भेगांमुळे सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.शहरात तीन ठिकाणी पोलीस वसाहती आहेत. अधीक्षक कार्यालयामागे, बशीरगंज भागात तसेच बालेपीर भागातील वसाहतींचा यात समावेश आहे. बुधवारी ‘लोकमत’ने पोलीस अधीक्षक कार्यालयास चिकटून असलेल्या वसाहतीचा आढावा घेतला. निजामकाळात वसलेल्या या वसाहतीला आता जुनी पोलीस कॉलनी या नावाने ओळखले जाते. या वसाहतीत ५० कुटुंबे राहतील एवढी घरे आहेत. वसाहतीत पाऊल ठेवताच उग्र वास येतो. डुकरांचा मुक्त संचार व सुबाभळींचा विळखा आहे. नाल्यांची एवढी दुरवस्था झाली आहे की, सांडपाण्याचे अक्षरश: गटार झाले आहे. नाल्यातील पाणी वाहून जात नसल्याने ते तुंबते. पावसाळ्यात पावसाच्या पाण्याची भर पडल्यास सांडपाणी घरांमध्ये शिरते. रस्ते व घराचा उंबरठा बरोबरीत असून पावसानंतर तळ्याचे स्वरुप येते. अंगणातील पाणी घरात शिरल्याने हाल होतात, असे पोलीस पत्नीने सांगितले.वसाहतीत पाण्याची समस्या अतिशय गंभीर असून एक हातपंप होता;परंतु तो अनेक वर्षांपासून नादुरुस्त आहे. पालिकेचे टँकर येते; परंतु आठ दिवसाला. राहायलाच जागा पुरत नाही, त्यामुळे पाणी साठवून ठेवणेही शक्य होत नाही. पोलीस अधीक्षक कार्यालयातील कुपनलिकेतून नळजोडणी घेतलेली आहे. ते पाणी पिण्यायोग्य नसल्याने धुणी, भांडी करण्यासाठी वापरले जाते. बहुतांश कुटुंबांना विकतचे पाणी घ्यावे लागते. (प्रतिनिधी)
सांडपाणी थेट घरांमध्ये; सुरक्षितताही धोक्यात
By admin | Updated: June 23, 2016 01:16 IST