आडूळ : गायरान जमिनीच्या जागेच्या वादातून भावकीतील दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात दोन जण गंभीर, तर एक महिला किरकोळ जखमी झाली आहे. ही घटना पैठण तालुक्यातील शिवगड तांड्यावर रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
शिवगड तांडा येथील राजू शंकर चव्हाण (३१), विष्णू शंकर चव्हाण (४०) व त्यांच्या आई द्रौपदाबाई शंकर चव्हाण (७५) यांचा व त्यांच्या भावकीतील काही जणांचा रस्त्याच्या कडेला असलेल्या गायरान जमिनीच्या जागेचा मागील बऱ्याच दिवसांपासून वाद सुरू होता. रविवारी सायंकाळी या दोन्ही गटांत जागेवरून बाचाबाची झाली. याचे रूपांतर जोरदार हाणामारीत झाले. या हाणामारीत राजू चव्हाण व विष्णू चव्हाण गंभीर जखमी झाले, तर त्यांच्या आई किरकोळ जखमी झाल्या आहेत. जखमींना आडूळ येथून रुग्णवाहिकेचे डॉ. सय्यद अस्लम, चालक सय्यद नासेर यांनी पुढील उपचारासाठी औरंगाबादेतील शासकीय रुग्णालयात दाखल केले. या घटनेची पाचोड पोलिसांना माहिती देण्यात आली असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. मारहाण करणाऱ्या दुसऱ्या गटातील नागरिकांनी घटनास्थळावरून पळ काढला आहे, तर आम्हाला मारहाण करण्यासाठी औरंगाबादेतून १० ते १२ लोक आणले होते. असा आरोप राजू चव्हाण व विष्णू चव्हाण यांच्या नातेवाइकांनी केला आहे. या घटनेत एका जखमीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.