नांदेड :विष्णूपुरी धरणाशी संबंधित गोदावरी नदीवरील ४ उपकेंद्रातील वीजपुरवठा ११ डिसेंबरपासून सिंगल फेज पद्धतीने सुरु करण्यात येणार असल्याने या फिडरशी संबंधित नदीपात्राच्या शेजारी गावकऱ्यांनी व शेतीपंपग्राहकांनी दक्षता बाळगावी, असे आवाहन वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता डी़ डी़ हामंद यांनी केले आहे़ गोदावरी नदीवरील विष्णूपुरी धरणातील पाणी उपसा करणारे विद्युत पंप बंद करण्यासाठी नाळेश्वर, विष्णूपुरी, पेनूर आणि मोहनपुरा हे ११ केव्ही़ क्षमतेचे चार फिडर्स बंद ठेवण्यात आले होते़ परंतु आता सर्व चारही फिडर्स बुधवारी मध्यरात्रीपासून म्हणजेच ११ डिसेंबर पासून पुन्हा सुरु करण्यात येणार आहेत़ या फिडर्सवरील तीनही वीज वाहिन्यांमध्ये एकाच फेजचा विद्युत प्रवाह देण्यात येणार आहे़ जेणेकरुन याद्वारे वीज पंप चालू शकणार नाहीत़ गोदावरी नदीपात्राच्या शेजारील सर्व गावकऱ्यांनी, शेती पंपाच्या ग्राहकांनी या वीज वाहिन्यांच्या संपर्कात येवू नये़ वीजवाहक तारांशी कुठलीही छेडछाड करु नये़ तसे केल्यास जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही हामंद म्हणाले़ त्यामुळे या भागामध्ये होणारा अवैध पाणीउपसा काहीअंशी बंद होण्याची शक्यता आहे़ (प्रतिनिधी)
नदीपात्राच्या शेजारील गावांना दक्षतेचा इशारा
By admin | Updated: December 11, 2014 00:28 IST