औरंगाबाद : विविध रस्त्यांवर वाहनाची वेगमर्यादा किती असावी, असे फलक पाहायला मिळतात. मात्र, वाहनचालक हे फलक वाचत नसून सर्रास वेगमर्यादेचे उल्लंघन केले जाते. वेगमर्यादा न पाळणाऱ्या वाहनांवर ‘स्पीड गण’ यंत्राद्वारे वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाते.
पोलिसांकडून होणारी कारवाई टाळायची असेल, तर वाहनधारकांना बीड बायपासवर ताशी ३० किमी आणि जालना रोडवर ४० किमी वेगमर्यादा पाळावी लागेल. दरवर्षी सुसाट वाहनांमुळे प्राणांतिक अपघातात अनेक वाहनचालकांचे बळी जातात. हे अपघात रोखण्यासाठी शासनाने वाहनांच्या वेगमर्यादा नियंत्रित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सन २०१७ साली अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक) यांनी एक परिपत्रक जारी केले. यासोबतच वेगमर्यादेचे पालन न करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी प्रत्येक शहराला दोन ‘स्पीड गण’ मशीन, तर महामार्ग पोलिसांनाही अशी यंत्रे देण्यात आली आहेत.
मनपा हद्दीतील जळगाव रोड, व्हीआयपी रोड, जालना रोड, सोलापूर-धुळे महामार्ग आदी रस्त्यांवर ९ आसन क्षमतेपर्यंत चारचाकी वाहनांसाठी ७० किलोमीटर प्रती तास, तर ९ किंवा जास्त आसन क्षमतेच्या वाहनांसाठी ताशी ६० किमी अशी वेगमर्यादा आहे. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांकरिता ६० किमी प्रती तास वेगमर्यादा ठरविण्यात आली आहे. दुचाकी मोटारसायकल, मोपेड आदी वाहनांकरीता ताशी ६० किमी, तर प्रवासी वाहतूक करणाऱ्या तीन चाकी रिक्षा, लोडिंग रिक्षा प्रती तास ५० किमी अशी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली.
------------------------
दोनच रस्त्यांवर कारवाई, अन्य मार्गावर मात्र वाहने सुसाट
वाहनांची गती मोजण्यासाठी औरंगााबाद पोलीस विभागाकडे असलेल्या दोन ‘स्पीड गण’ यंत्रापैकी एक वाळूज रोडवर आणि दुसरे बायपासवर नजर ठेवून आहे. मात्र, अन्य रस्त्यांवर सुसाट वाहनचालक मोकाटच आहेत.
-----------------------
चौकट
वेगमर्यादा कमी केल्याने अपघात घटले
बीड बायपासवर गतवर्षी अपघाताची मालिका रोखण्यासाठी तत्कालीन पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी विशेष अधीसूचना काढून बायपासवरील वाहनांची वेगमर्यादा ताशी ३० किमी अशी केली होती. या वेगमर्यादेमुळे बायपासवरील अपघात कमी झाले आहेत.
--------------------------------
वाहतूक विभागाकडे दोन स्पीड गण यंत्रे (इंटरसेप्टर) यंत्रे आहेत. ही यंत्रे वेगवेगळ्या रस्त्यावर नेऊन वेगमर्यादा न पाळणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते.- सुरेश वानखेडे, एसीपी, वाहतूक विभाग