उस्मानाबाद : दुष्काळाने होरपळलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील ३६ महाविद्यालयातील दोन हजार विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे एक कोटींची मदत देण्यात येणार आहे. खा. शरद पवार यांच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून हा उपक्रम हाती घेण्यात आला असून, यासाठी विद्यार्थ्यांची निवडही संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी केलेली असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खा. शरद पवार यांनी दोन वेळा दौरे केले होते. वयाच्या पंच्चाहत्तरीतही दुष्काळग्रस्तांसाठी विविध मागण्या करीत रणरणत्या उन्हामध्ये ते मोर्चात सहभागी झाले होते. शेतकऱ्यांना १०० टक्के कर्जमाफी मिळावी यासाठी ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची व्यक्तिश: भेट घेतली आणि दुष्काळाची दाहकता त्यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतरही ते सातत्याने याबाबत पाठपुरावा करीत आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या पाल्याचे शुल्क भरणे अवघड झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंध:कारमय आहे, हे पवार यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सरकारकडून मदतीची अपेक्षा न धरता सुमारे १ कोटी रुपयांची मदत शिक्षणासाठी मिळावी यासाठी पुढाकार घेतला. डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जाणार आहे. प्रतिकूल परिस्थितीत शिकणारे विद्यार्थी व ज्यांचे शैक्षणिक शुल्क दहा हजार रुपयांपेक्षा अधिक आहे तसेच ज्या विद्यार्थ्यांना फिसमध्ये कोणतीही शासकीय सवलत मिळत नाही, असा निकष यासाठी ठरविण्यात आला होता. (प्रतिनिधी) या मदतीनंतरही जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांचे सर्व प्रकारचे शुल्क शासनाने माफ करावे, यासाठी हिवाळी अधिवेतनात जिल्ह्यातील दहा हजारावर विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरींचे निवेदन देवून याबाबत पाठपुरावा करण्यात येणार आहे. सततच्या दुष्काळामुळे जिल्ह्यात आणिबाणीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या अडचणीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्ह्यातील जनतेला शासनाकडून हक्काची मदत मिळावी यासाठी आक्रमकपणे प्रयत्न करत असल्याचे आ. पाटील यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
दोन हजार विद्यार्थ्यांना देणार कोटीची मदत
By admin | Updated: December 14, 2015 23:53 IST