लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जायकवाडी-जालना योजेतून शहराला मुबलक पाणी उपलब्ध होत असतानाही केवळ वितरण व्यवस्थेतील अडचणींमुळे शहराला आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा होत आहे. त्यातच अवैध नळ जोडण्या पालिकेची डोकेदुखी ठरत आहे. २० हजारांपेक्षा अधिक असलेल्या नळ जोडण्यांचा शोध घेण्यासाठी पालिकेने पथकांची स्थापना केली असून, पाणी चोरणा-यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.नगर पालिकेच्या नोंदीनुसार शहरात ४४ हजार मालमत्ता असून, सध्या सुरू असलेल्या सर्वेक्षणानुसार त्यात सुमारे २० हजार मालमत्तांची भर पडण्याची शक्यता आहे. असे असले तरी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागात केवळ २२ हजार अधिकृत नळ जोडणीची नोंद आहे. अधिकृत नळ जोडणी असणारे अनेक नागरिक नियमित पाणीपट्टी भरत नाहीत. त्यामुळे पाणीपट्टीची वसुली जेमतेमच आहे. कन्हैयानगर भागात सुमारे चारशे घरे असताना पाणीपट्टी भरणा-या नागरिकांची संख्या केवळ ४० आहे. जुनी औद्योगिक वसाहतीच्या परिसरासह झोपडपट्टी भागांमध्ये अवैध नळ जोडण्यांचे प्रमाण अधिक आहे. विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी नुकतीच पालिकेत आढावा बैठक घेऊन अवैध नळ जोडण्यांचा शोध घेण्याचे निर्देश दिले होते.
वीस हजारांवर अवैध नळ जोडण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 00:44 IST