तुळजापूर : शहरातील सारा गौरव कॉलनी भागात चोरट्यांनी शनिवारी रात्रीच्या सुमारास एकच धुमाकूळ घातला़ चोरट्यांनी एक दोन नव्हे तब्बल चार घरे फोडून ४२ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़ या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पोलिसांनी सांगितले की, वनविभागात वनरक्षक म्हणून कार्यरत असलेले शहाजी भारत देशमुख हे शहरातील सारा गौरव परिसरातील बी-१२ मधील घरात राहतात़ देशमुख यांच्यासह संजय काकडे, शशिकांत सवणे, पोकॉ मालवडीकर या चौघांच्या कुटुंबातील सदस्य बाहेरगावी गेले होते़ चा चौघांच्याही घरी कोणी नसल्याची संधी साधून शनिवारी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करून चारही घरातील मुद्देमाल लंपास केला़ कॉलनीतील नागरिकांना रविवारी सकाळी ही बाब निदर्शनास आली़ त्यानंतर त्यांनी चारही कुटुंबातील सदस्यांना फोन लावले़ मात्र, केवळ देशमुख यांच्याशी संपर्क झाला़ देशमुख हे उस्मानाबादला असल्याने ते त्वरित घराकडे आले़ त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोनि ज्ञानोबा मुंडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला़ त्यावेळी चोरट्यांनी देशमुख यांच्या घरातील लोखंडी कपाटातील १० ग्रॅमची कर्णफुले, पाच ग्रॅमचे सोन्याचे लॉकेट, चांदीचे फुलपात्र, चांदीची गणपतीची मुर्ती, चांदीचे चमचे असा ४२ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़ त्यानंतर चोरट्यांनी बी-३६ मधील संजय काकडे, बी-३७ मधील शशिकांत सवणे व बी-५२ मधील पोकॉ मालवडीकर यांच्याही घराचे कुलूप तोडले़ त्यांच्या घरातील लोखंडी कपाटातील साहित्य चोरून नेले आहे़ मात्र, हे तिघेही बाहेरगावी असल्याने किती मुद्देमाल गेला हे समजू शकले नाही़ याबाबत तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सपोनि पवार हे करीत आहेत़ (वार्ताहर)सारा गौरव भागातून मागील आठवड्यातच एक नवीकोरी दुचाकी चोरट्यांनी लंपास केली आहे़ या दुचाकीचा पत्ता लागण्यापूर्वीच एक दोन नव्हे चार घरे फोडल्यामुळे खळबळ उडाली असून, चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे़सारा गौरव कॉलनीतील चोरी झालेल्या चारही घरातील नागरिक कुलूप लावून बाहेरगावी गेले होते़ सुटीनिमित्त घरातील नागरिक बाहेर गेल्यामुळे कुलूप असल्याची संधी साधून चोरट्यांनी ही चोरी केली आहे़तीन घरांना पोलिसांनी लावले कुलूप४सारा गौरव येथील भारत देशमुख यांच्यासह संजय काकडे, शशिकांत सवणे, पोकॉ मालवडीकर या चौघांपैकी केवळ भारत देशमुख हे घटना कळाल्यानंतर घरी आले होते़ मात्र, इतर तिघांचा संपर्क न झाल्याने ते घराकडे आले नव्हते़ पोलिसांनी देशमुख यांच्या घराचा पंचनामा करून इतर तीन घरांना कुलूप लावले़
तुळजापुरात चार घरे फोडली
By admin | Updated: May 25, 2015 00:27 IST