औरंगाबाद : राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असतानाही कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे; परंतु कांद्याचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने कांदा विकावा लागत आहे. कांदा उत्पादकांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीतर्फे आज मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे यांना कांद्याचा अहेर देण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी महिला आघाडीला कांदा जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात नेण्यास विरोध केल्यामुळे त्यांनी फक्त निवेदन दिले. राज्यात कांदा उत्पादकांनी यावर्षी मोठ्या प्रमाणावर कांदा पिकविला आहे. यापूर्वी जेव्हा अतिरिक्त कांदा उत्पादन होऊन भावाची समस्या निर्माण झाली. तेव्हा हमी भाव देऊन सरकारने नाफेडमार्फत कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. यावर्षी मात्र सरकारने नाफेडमार्फत बाजारभावाप्रमाणे कांदा खरेदी सुरू केली आहे. ही खरेदी मुद्दाम कमी दराने होत असून, कांद्याचा भाव पाडण्यासाठी होत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले. मात्र, त्याची दखल घेतली गेली नाही. सरकारचे पुन्हा या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटना महिला आघाडीच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना कांद्याचा अहेर देण्याचे आंदोलन सुरू केलेआहे.
कांद्यांचा अहेर देण्याचा प्रयत्न...
By admin | Updated: May 18, 2016 00:11 IST