राजकुमार जोंधळे , लातूरजगभरात आदर्श ठरलेले देशाचे संविधान आणि त्याविषयी असलेले कुतूहल अनेकांसाठी संशोधनाचा विषय आहे. तुमच्या आमच्या घरी पुस्तकरुपाने मिळणाऱ्या संविधानाची प्रत असते. परंतु, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ताक्षरातील देशाच्या संसदेमध्ये जतन करून ठेवण्यात आलेल्या मूळ संविधानाच्या प्रतीची सत्यप्रत (झेरॉक्स प्रत) मिळवून ती प्राणपणाने जतन करुन ठेवली आहे मुरुड येथील संभाजी महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश वाघमारे यांनी. ही सत्यप्रत आपल्याकडेही असावी, यासाठी त्यांनी थेट दिल्ली गाठून ती महत्तप्रयासाने मिळविली आहे. रामविलास पासवान यांच्या मदतीने मिळविलेल्या हस्तलिखित संविधानांच्या संघर्षाची कहाणीही रोचकच आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या निर्मितीसाठी रात्रं-दिवस परिश्रम घेतले. बाबासाहेबांनी राज्यघटना स्वत:च्या हस्ताक्षरात लिहिली. बाबासाहेबांच्या हस्ताक्षरातील राज्यघटना म्हणजे जणू इतिहासातील अमूल्य ठेवा. त्यांच्या मोत्यासारख्या सुंदर हस्ताक्षरात साकारलेली राज्यघटना आपल्या देशाच्या संसदेत ठेवण्यात आली आहे. एकदा दिल्ली भेटीत ही बाब प्राचार्य सुरेश वाघमारे यांच्या कानावर आली. बाबासाहेबांच्या हस्ताक्षरातील ही मूळ प्रत आपल्या घरी आणणे शक्य नाही. परंतु, किमान याची सत्यप्रत (झेरॉक्स कॉपी) तरी आणता येईल, या विचाराने वाघमारे प्रेरित झाले. यासाठी मग त्यांनी गाठीभेटी आणि परवानग्या मागणे सुरु केल्या. १९७९ साली त्यांनी थेट नेते रामविलास पासवान यांची भेट घेतली. त्यांनी त्यांच्या या मागणीचा आदर करुन देशाच्या संसदेत नेले. सोबत संसदेतील एक कर्मचारी दिला. त्याने सांसदीय मंत्रालयातील सारे सोपस्कार पूर्ण करुन अवघ्या २४ तासात त्या मूळ संविधानाच्या प्रतीची सत्यप्रत मिळवून दिली. विशेष म्हणजे कव्हरसह पाने रंगीत पानांचे रंगीत तर ब्लॅकन् व्हाईट पाने आहेत तेवढ्यांची ब्लॅकन् व्हाईट झेरॉक्स काढून दिले.घटना निर्मितीसाठी २ वर्षे ११ महिने १७ दिवसांचा कालावधी लागला होता. यासाठी एकूण ११ अधिवेशने झाली. या अधिवेशनांमध्ये ७ हजार ७३५ सूचना सुचविण्यात आल्या. त्यातील २ हजार ४७३ सूचनांवर प्रत्यक्ष सभागृहामध्ये चर्चा करण्यात आली. ११ अधिवेशनांपैकी ६ अधिवेशनात उद्दिष्टांचा ठराव, मूलभूत हक्क, अल्पसंख्यांक जमाती, शेड्युल्ड कास्ट या समित्यांच्या अहवालावर चर्चा करण्यात आली आहे. तर पाच अधिवेशन हे घटना मसुदेच्या विचारासाठी खर्च करण्यात आले आहेत. घटना निर्मितीसाठी दीर्घकाळ चर्चा करावी लागली. किचकट प्रश्नांवर चर्चा आणि उत्तरे शोधावी लागली. जगात एकमेव असे आदर्श संविधान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नातून निर्माण झाले. अमेरिकेच्या घटनेला चार महिने, कॅनडा २ वर्षे ५ महिने, आॅस्ट्रेलिया ९ वर्षे तर भारताच्या घटनेला २ वर्षे ११ महिने १७ दिवस लागले आहेत. भारताच्या घटना मसुदा समितीमध्ये आठ माणसे होती. परंतु, प्रत्येकाच्या अडचणींमुळे एकट्या आंबेडकरांवरच ही जबाबदारी आली. अभ्यासूपणा म्हणून मी अनेक ग्रंथ संकलित करुन माझ्या घरात स्वत:चे वाचनालय विकसीत केले आहे. तब्बल आठ हजारांहून अधिक ग्रंथ माझ्या घराच्या सर्वात वरच्या माळ्यावरील या ग्रंथालयात आहेत. यातील सर्वात अनमोल ग्रंथ म्हणाल तर डॉ. बाबासाहेबांच्या हस्ताक्षरातील मूळ संविधानाची ही झेरॉक्स कॉपी. तिच्यासाठी खास एक रॅक सजवून मी त्यात ही प्रत ठेवली आहे. २३१ पानांचा हा ग्रंथ माझ्यासाठी अत्यंत अनमोल असल्याचे प्राचार्य डॉ. सुरेश वाघमारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
बाबासाहेब लिखित संविधानाची सत्यप्रत प्राणपणाने जपली!
By admin | Updated: November 25, 2015 23:19 IST