औरंगाबाद : देशभरात १९९५ पासून दरवर्षी पोलिओ निर्मूलनासाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येते. मात्र, अद्यापही पोलिओचे समूळ उच्चाटन झालेले नाही. दरम्यान, आजपर्यंत पोलिओ निर्मूलनासाठी वापरात असलेली त्रिगुणी लस घातक असल्याचा निष्कर्ष प्रयोगशाळेने दिल्यामुळे शासनाने ही लस आता कायमची हद्दपार केली असून, २५ एप्रिलपासून यासाठी अत्यंत प्रभावी अशी द्विगुणी लस वापरात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे पोलिओची नवीन लस उपलब्ध झाली असून, ती जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालयांसाठी इंजेक्शनाद्वारे दिली जाणारी ३५०० लस, बाळांना पाजण्यासाठी २०,००० लस रवाना करण्यात आल्या आहेत. ज्या आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरणाचा दिवस असेल, तेथे नवजात बालकाला (पहिल्यांदाच लसीकरणाचा लाभार्थी बालक) ‘आयपीव्ही’ (इनअॅक्टिव्ह पोलिओ व्हायरस व्हॅक्सीन) ही लस इंजेक्शनद्वारे दिली जाणार आहे. इंजेक्शनद्वारे दिली जाणारी ही लस अत्यंत प्रभावी, सुरक्षित व परिणामकारक असल्याची माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी दिली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त बालकांना या लसीचा लाभ देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.यंदा ती १७ जानेवारी व २१ फेब्रुवारी रोजी राबविण्यात आली. त्रिगुणी पोलिओ लसीकरणाची ती मोहीम अखेरची होती. पोलिओच्या त्रिगुणी लसीमध्ये प्रामुख्याने पी-१, पी-२ आणि पी-३ हे रोग प्रतिबंधात्मक तीन घटक होते. त्यापैकी लसीतील ‘पी-२’ हा घटक पोलिओ होण्यास कारणीभूत ठरल्याचा धक्कादायक अहवाल राष्ट्रीय प्रयोगशाळेने दिला होता. आता उपलब्ध असलेली नवीन लस शंभर टक्के परिणामकारक असल्याचा दावा डॉ. खतगावकर यांनी केला आहे.
त्रिगुणी लस हद्दपार
By admin | Updated: April 24, 2016 00:16 IST