लातूर : राज्यात लागू झाल्यापासून दोन वर्षात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतून लातूर जिल्ह्यातील सात हजार आठ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. या रुग्णांवरील उपचारापोटी विविध रुग्णालयांना राज्य शासनाच्या वतीने तब्बल १४ कोटी १४ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. किडनी, मेंदू, हृदय आणि अपघातातील जखमींसह तब्बल ९७१ आजारांवर रुग्णांना उपचार मिळाले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या वतीने २१ नोव्हेंबर २०१३ पासून राजीव गांधी जीवनदायी योजना लागू झाल्यानंतर ती योजना जिल्ह्यातील रुग्णांसाठी खरोखर ‘जीवनदायी’ ठरल्याचे चित्र लातूर जिल्ह्यात आहे. मराठवाड्यात औरंगाबादनंतर लातूर जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्णांनी या योजनेचा लाभ मिळविला आहे. दोन वर्षात जिल्ह्यातील सात हजार १३१ रुग्णांनी उपचारसाठी पूर्वपरवानगी मागितली होती. त्यापैकी ७००८ रुग्णांनी उपचार घेतले आहेत. उपचार घेणाऱ्यामध्ये ३०१९ स्त्री तर ३९८९ पुरुष रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात उपचार घेतलेल्या रुग्णांमध्ये ७४ रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात उपचार झाले आहेत तर ५०४० रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. उरलेल्या रुग्णांवर जिल्ह्याबाहेरील रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. नऊ खासगी रुग्णालयात उपचार लातूर जिल्ह्यातील या नऊ रुग्णालयांचा राजीव गांधी जीवनदायी योजनेत समावेश आहे. यामध्ये अल्फा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, छत्रपती शाहू अॅक्सिडेंट हॉस्पिटल, देशपांडे हॉस्पिटल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, लातूर कॅन्सर हॉस्पिटल, लाईफकेअर हॉस्पिटल अँड रिसर्च सेेंटर उदगीर, ममता हॉस्पिटल, एमआयटी माईर्स वैद्यकीय महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालय, चांडक हॉस्पिटल मुरुड या रुग्णांलयाचा समावेश आहे.
सात हजार रुग्णांवर दोन वर्षात उपचार
By admin | Updated: April 27, 2015 01:00 IST