बीड : खून, दरोडे, लूटमार, प्राणघातक हल्ला अशा गंभीर प्रकरणात अडकलेल्या शाम भीमराव आठवले (वय ४४, रा. माळीवेस, बीड) याचा रविवारी पोलिसांशी झालेल्या ‘फिल्मीस्टाईल’ चकमकीत थरारक अंत झाला. गेवराई तालुक्यातील धोंडराई येथे पोलिस आणि आठवले यांच्यात दहा मिनिटे चकमक उडाली. २४ तास शस्त्रास्त्रांसह वावरणारा शाम अखेर पोलिसांच्या बंदुकीचा निशाणा ठरला. मागील दोन तपांपासून तो गुन्हेविश्वात होता. त्याने पोलिसांना अक्षरश: जेरीस आणले होते. शाम आठवले! जिल्ह्याच्या गुन्हेजगतातील एक कुप्रसिद्ध नाव! साधारण १९९२ मध्ये खुनासारख्या गंभीर गुन्ह्यापासून त्याने गुन्हे जगतात ‘एंट्री’ केली अन् पुढे त्याचे धाडस वाढतच गेले. पोलिस अन् शाम यांच्यात लपाछपीचा खेळ रंगतच गेला. त्याच्याविरुद्ध तब्बल २० गुन्हे नोंद आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी ठाणे, बीडमधील शिवाजीनगर व पेठ बीड ठाण्यातील प्रत्येकी एक फिर्याद वगळता उर्वरित १७ गुन्हे त्याने बीड शहर ठाणे हद्दीत केले आहेत. १९९३ मध्ये त्याच्याविरुद्ध दुसरी फिर्याद दाखल झाली. १९९५ मध्ये मारहाणीचे दोन गुन्हे नोंद झाले. १९९६ मध्ये चोरी, मारहाण व प्राणघातक हल्ला असे तीन गुन्हे करुन त्याने स्वत:च्या क्राईमरेकॉर्डमध्ये भरच टाकली. १९९७, १९९९, २००० व २००१, २००२ मध्येही तो गुन्हे करतच राहिला. २००३ मध्ये त्याच्या नावावर दोन गुन्हे नोंद करण्यात आले. २०११, २०१२ मध्ये प्रत्येकी एक व २०१४ मध्ये दोन गुन्हे केल्याची फिर्याद आहे. दिवाळीपासून होते पोलिस मागावरऐन दिवाळीच्या धामधुमीत शाम आठवले याने बीड शहरातील माळीवेस परिसरातील एका दुकानावर गोळीबार करत दहा लाखांचा दरोडा टाकला होता. या प्रकरणात सनी व अक्षय ही त्याची दोन मुलेही आरोपी आहेत. गुन्ह्यासाठी त्याने इंदौरहून खास आरोपीही मदतीला घेतले होते. या गुन्ह्यानंतर तो रातोरात फरार झाला होता. तेंव्हापासून पोलिस त्याच्या मागावर होते. तो धोंडराईत दडल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर सापळा लावला गेला;परंतु चकमकीत तो पोलिसांच्या गोळीचा निशाणा ठरला.मोक्क्याची झाली होती तयारीशाम आठवले याने गुन्हेविश्वात अवघ्या काही वर्षांतच जम बसविला होता. गुन्हा करायचा... पसार व्हायचे... पकडल्यावर जामिनावर सुटायचे अन् पुन्हा गुन्हे करतच रहायचे... असा त्याचा एककलमी कार्यक्रम होता. माळीवेसमध्ये दिवाळीत दुकान लुटल्यावर पोलिसांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाईची रणनीती होती. मात्र, त्याआधीच तो ठार झाला. (प्रतिनिधी)४शाम आठवले कायम शस्त्रे जवळ बाळगून वावरत असे. तो धोंडराईत दबा धरुन बसल्याची माहिती कळाल्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पूर्ण तयारीनिशी गेले होते. ४अपेक्षेप्रमाणे त्याने पोलिसांच्या दिशेने चार फायर केलेच;परंतु पोलिसांनी ते चुकविले. ४आठवलेकडील बंदुकीतून सुटलेल्या गोळ्या पोलिसांच्या वाहनांचा निशाणा ठरला. ४प्रत्यूत्तरादाखल पोलिसांनी पोलिसांनी धरलेला नेम मात्र चुकला नाही. या निशाण्याने शामला रक्ताच्या थारोळ्यात पाडले. त्यानंतर अवघ्या काही क्षणातच तो मृत्यूमुखी पडला. ४दहा मिनिटे हा थरार सुरु होता, अशी सूत्रांची माहिती आहे.
दोन तपांच्या गुन्हेगारीचा थरारक शेवट
By admin | Updated: December 15, 2014 00:47 IST