जालना : करवानगर येथील रहिवासी कमलेश कवरानी यांना फे्रजर बॉईज शाळेजवळ आडवून बेदम मारहाण करीत १० लाखांची लूट २१ जुलै रोजी करण्यात आली. पोलिसांनी पाचपैकी तिघा आरोपींना पकडले. तर एकाकडून १ लाख २७ हजार रुपये बुधवारी जप्त करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवून आरोपींना मुद्देमालासह पकडण्यात यश मिळविले. यात शिकलकरी मोहल्ल्यातील विनोद चौधरी, मानदेऊळगाव (ता.बदनापूर) येथील सतीश भीमराव डोळसे व शहरातील रामनगर येथील विलास लक्ष्मीनारायण नलमेल यांना अटक करण्यात आली. या आरोपींनी आपल्या अन्य दोन साथीदारांची नावेही पोलिसांना सांगितली आहेत. मात्र रोकड घेऊन हे आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत असून लवकरच पकडण्यात येईल, असा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कारवाईचे आदेश दिले होते. तपासासाठी विविध पथके शहरात तैनात करण्यात आली होती. खबऱ्यांची मदत घेऊन संपूर्ण माहिती गोळा करण्यात आली. कमलेश कवरानी यांच्याकडूनही आरोपींविषयी माहिती मिळविली. शिवाय ज्या दांड्याने मारहाण करण्यात आली त्यावर ‘राम’ लिहिले होते. तो जप्त करण्यात आला. त्यानंतर चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आला. एकाचवेळी विविध ठिकाणी छापे मारण्यात आले. त्यात तिघांना पकडण्यात आले. आरोपींनी कवरानी हे दुकानातून निघाल्यापासून पाळत ठेवली होती. दोघेजण पाठलाग करीत शिवाजी पुतळ्यापर्यंत आले. फे्रजर बॉईजजवळ आल्यानंतर त्यांनी मोटारसायकल अंधारात वळविली. त्यानंतर एकाच गाडीवर बसून तिघे गतिरोधकाजवळ आले. त्याच ठिकाणी एकाने दांड्याने मारहाण करण्यात सुरूवात केली. दुसऱ्याने चाकूने हल्ला चढवत पैशाची पिशवी हिसकावण्याचा प्रयत्न केला. तिसरा आरोपी गाडीवर बसल्यानंतर पळून जाण्यास सज्ज होता. अवघ्या तीन मिनिटांत कवरानी यांना जायबंदी करून १० लाख रूपयांसह पिशवी पिवळ्या दुचाकीवरून पळविली. त्यात सहकार्य करणाऱ्यांना १ लाख २७ लाख रूपये वाटप करून उर्वरित रक्कम घेऊन दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिली. पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी, जमादार अर्जुन पवार, रवी जोशी, अमोल देशमुख, अंबादास साबळे, साई पवार, गजानन भोसले, धनाजी कावळे आदींनी आरोपींना पकडले. (प्रतिनिधी) व्यापाऱ्यांचे निवेदनशहर व्यापारी महासंघाच्या वतीने पोलिस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह यांना निवेदन सादर करण्यात आले. शहरातील वाढत्या चोऱ्या, घरफोडी व लूटमार प्रकरणांची तड लावण्याची मागणी करण्यात आली. यावेळी सतीश पंच, अर्जुन गेही, नरेंद्र अग्रवाल, सुखदेव बजाज, सुरेश कवरानी, अर्जुन बजाज, सुरेश कवरानी, अनील कवरानी, विजय मोटवानी आदींची उपस्थिती होती.
व्यापाऱ्यावर हल्लाप्रकरणी जालन्यातील तिघे जेरबंद
By admin | Updated: July 24, 2014 00:14 IST