उमरगा : परतीच्या पावसाने ओढ दिल्याने तालुक्यातील ६९ हजार हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, तूर, उडीद, संकरीत ज्वारी या खरीप पिकांची वाढ खुंटली असून, वाढीस लागलेली पिके पिवळी पडू लागल्याने अपुऱ्या ओलीमुळे ६९ हजार हेक्टरवरील पिके धोक्यात आली आहेत.तालुक्यात यावर्षी पावसाने तब्बल एक महिन्याने उशिरा प्रारंभ केला. ७ जुलैपासून होणाऱ्या खरीप पेरण्या एक महिन्याने उशिराने सुरु झाल्या. खरीप हंगाम पेऱ्याचा हंगाम निघून गेल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीला अधिकची पसंती दर्शविली. तालुक्यात पावसाची एकूण ८५० सरासरी असताना आतापर्यंत फक्त ४५० मिमी पाऊस झाला आहे. मध्यंतरीच्या कालावधी दरम्यान, पावसाने ओढ दिल्याने संपूर्ण खरीप हंगाम धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली होती. गणेशोत्सव कालावधीदरम्यान, पावसाचे पुन्हा पुनरागमन झाल्याने पिकांना जीवदान मिळत पिके सावरली असली तरी मागील २० दिवसांपासून उष्णतेची तीव्रता आणि पावसाची कमतरता यामुळे जमिनीतील ओल कमी होवून वाढीस लागलेली पिके पिवळी पडू लागली आहेत. तुरीच्या एकूण सरासरी १४ हजार ६८० हेक्टर क्षेत्रांपैकी १३ हजार ३५३ हेक्टर क्षेत्रात पेरण्या करण्यात आल्या आहेत. मुगाच्या एकूण चार हजार ५०० हेक्टर क्षेत्रांपैकी फक्त एक हजार ६० हेक्टर क्षेत्रावर मुगाची पेरणी झाली आहे. उडीदाच्या एकूण ८ हजार ९६५ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. खरीप ज्वारीच्या एकूण ११ हजार २५१ हेक्टर क्षेत्रांपैकी ७ हजार २७२ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. शेतकऱ्यांनी यावर्षी उशिराने पेरण्या झाल्याने सोयाबीन पेऱ्याला अधिकची पसंती दर्शविली असून, तालुक्यात सोयाबीनचे सरासरी ६ हजार ९१७ हेक्टर क्षेत्र असताना तालुक्यातील शेतकऱ्यांनी २५ हजार १७७ हेक्टर क्षेत्रात सोयाबीनच्या पेरण्या केल्या आहेत. (वार्ताहर)
६९ हजार हेक्टरवरील पिके धोक्यात
By admin | Updated: September 25, 2014 00:53 IST