औरंगाबाद : पडेगावात चोरट्यांनी एकाच रात्री ८ दुकानांचे कुलूप तोडून हजारो रुपयांचा माल चोरून नेऊन पोलिसांची झोप उडवून टाकली. यादरम्यान, एका व्यक्तीवर हल्ला करून त्यास जखमी केल्याची घटना घडली असून, चोऱ्यामाऱ्याच्या घटनात वाढ झाली असून, पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पडेगाव राष्ट्रीय महामार्गावर असल्याने दिवस-रात्र वाहनांची वर्दळ सुरूच असते. पोलिसांची वाहने सारखी ये-जा करताना आढळतात. मात्र, रात्री एक वाजेच्या सुमारास गाव सुनसान झोपी जाते. त्यानंतर चोरट्यांनी एकानंतर एक, असे ८ दुकानांचे शटर व कुलूप तोडून आत प्रवेश करून चोऱ्या केल्या. सकाळी चहाच्या टपरीवाल्याने दुकान उघडले तेव्हा सर्व सामानाची चोरी झाल्याचे निदर्शनास आले. या चोरीच्या प्रकारामुळे संतप्त नागरिक व व्यापारी रोडवर आले होते. सय्यद मजीद याने सकाळी ७ वाजता छावणी पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलीस निरीक्षक गौतम फसले, सहायक निरीक्षक विजय घेरडे, सहायक फौजदार रहिम शेख यांनी घटनास्थळ गाठून चौकशी केली. चोरीविषयी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली.
पडेगावात एकाच रात्री ८ दुकाने फोडून हजारोंचा माल पळविला
By admin | Updated: January 23, 2015 00:56 IST