अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई गेल्या तीन वर्षांपासून अंबाजोगाई तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने विहिरी, इंधन विहिरी, हातपंप, विद्युतपंप, साठवण तलाव, पाझर तलाव, यांच्या पाणीपातळीत कमालीची घट झाली आहे. परिणामी, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस उग्र रूप धारण करीत आहे. मेपेक्षा जून महिना अतिउष्णतेचा ठरू लागल्याने आता नागरिकांना पावसाची प्रतीक्षा लागली आहे. अंबाजोगाई तालुक्यात गेल्या तीन वर्षांपासून अत्यल्प प्रमाणात पाऊस झाल्याने सर्वत्र दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या तीन वर्षांपासून या परिसरात असलेले मांजरा धरण न भरल्याने तसेच परिसरातील साठवण तलाव, पाझर तलाव, गावोगावच्या विहिरी, विंंधन विहिरी, हातपंप, विद्युतपंप, साठवण तलाव, पाझर तलावांच्या पाणीपातळीत कमालीची घट झाली आहे. गेल्या दोन आठवड्यापासून उन्हाची वाढती तीव्रता वाढूच लागल्याने कधी नव्हे ते अंबाजोगाईतील तापमान ४० ते ४२ अंशांपर्यंत जाऊन पोहोचले आहे. गावोगावी ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांसमोर पिण्याच्या पाण्याच्या बरोबर गुरांच्या पाण्याचा प्रश्नही तीव्रतेने भेडसावू लागला आहे. पाण्याची उपलब्धता असली तरीही भारनियमनामुळे उपलब्ध असलेले पाणीही मिळणे दुरापास्त झाले आहे. अंबाजोगाई तालुक्यातील ८३ हातपंप पाणी कमी झाल्याने बंद आहेत. तर सहा विद्युतपंप पाणी आटल्याने बंद पडले आहेत. पाणीपुरवठा करणाऱ्या व शासनाने अधिग्रहण केलेल्या विहिरी व विंधन विहिरींनी आता तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जून महिन्यातही मोठ्या तीव्रतेने भेडसावू लागला आहे. तालुक्यातील अनेक गावे तहानलेलीच असल्याचे दिसून येत आहे. अनेक गावांत आता पाण्यासाठी रानोमाळ भटकंती सुरू असल्याचे चित्र दिसू लागले आहे. गावात एखादाच जलस्त्रोत सुरू असल्यास त्यावर कमालीची गर्दी दिसते. या गावांना पाणीपुरवठा करण्याची मागणी होत आहे.आता प्रतीक्षा वरुणराजाचीपावसाळा सुरू होऊनही सुटेना पाणी प्रश्नतालुक्यातील अनेक गावे आजही तहानलेलीचपाणीपातळी खालावल्याने हातपंप, विद्युतपंप झाले शोभेची वस्तूटँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची होतेय मागणीमांजरा धरणाचीही पाणीपातळी खालावलेलीचअंबाजोगाई तालुक्यातील गावांना लागली वरुणराजाची प्रतीक्षा
अंबाजोगाई तालुक्यात पाणीप्रश्न झाला गंभीर
By admin | Updated: June 12, 2014 01:36 IST