जालना : श्रींचे मनमोहक रुपडे, त्यांचे डोळे आणि लोभसपणा लहानपणीच भावला अन् इयत्ता चौथीला असतानाच पहिली गणेशाची मूर्ती मातीपासून तयार केली. लहान वयापासून हा छंद जडला तो अजून कायम असल्याचे मूर्तीकार गुलाब पठाण सांगतात. कलेच्या प्रांतात जात, धर्म आणि पंथाला महत्त्व नसते. तेथे केवळ कला आणि साधना महत्त्वाची असते, असे ते आवर्जून सांगतात. गुलाब म्हणाले, माझे कुटुंब मूळचे नाशिक जिल्ह्यातील मनमाडचे. शाळेत शिक्षण घेत असताना गावात सार्वजनिक मंडळांतर्फे बसविण्यात ेयेणारी श्रींची मूर्ती पाहिली. तेव्हापासून आपणही श्रींची मूर्ती तयार करावी, असा विचार मनात आला. दुसऱ्याच दिवशी मातीपासून श्रींची मूर्ती तयार केली. तेंव्हा शाळेत शिक्षकांनी केलेले कौतूक आजही माझ्या स्मरणात आहे. घरच्या परिस्थितीमुळे जेमतेम दहावीपर्यंत शिक्षण घेऊ शकलो. त्यानंतर श्रींची मूर्ती करण्याकडे माझा कल वाढला आणि तेव्हाच ठरवले की आता मूर्तीकार व्हायचे. २० वर्षांपूर्वी जालन्यात स्थायिक झालेले गुलाब पठाण यांची गणेशावर निस्सिम श्रद्धा आहे. दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी गुलाब हे जवळपास ६०० ते ७०० छोट्या आणि १५० मोठ्या मूर्ती तयार करतात. यासाठी मूर्ती आकर्षक आणि सुबक व्हाव्यात याकडे त्यांचा कटाक्ष असतो. रायगड जिल्ह्यातील पेण येथून काही मूर्ती ते आणतात. मात्र, यंदा पाणीटंचाईमुळे मूर्तींच्या किमतीत जवळपास २० टक्क्यांनी वाढ झाल्याचे गुलाब पठाण सांगतात. सद्यस्थितीत औरंगाबाद, परभणी आणि चिखली येथेही श्रींच्या मूर्ती मोठ्या प्रमाणात तयार केल्या जात असल्याने किमतीवर परिणाम जाणवत असल्याचे गुलाब पठाण म्हणाले. मोठी मूर्ती ५ ते २५ हजार रुपयांना, तर लहान मूर्ती ही ५५ ते ५०१ रुपयांदरम्यान असल्याचे गुलाब यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
कुठल्याही कलेला जात, धर्म नसतो..!
By admin | Updated: September 4, 2015 00:25 IST