बीड : शेतकऱ्यांनी योग्य वेळी पीकविमा भरल्यामुळे मराठवाड्यात सर्वाधिक पीकविमा ३३६ कोटींचा मंजूर झाला आहे. ही बाब स्वागतार्ह नसली तरी शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे. हा पीकविमा त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी केले.शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित शेतकरी मेळावा व मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या.व्यासपीठावर खा. डॉ. प्रीतम मुंडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, आ. आर. टी. देशमुख, आ. संगीता ठोंबरे, आ. भीमराव धोंडे, आ. लक्ष्मण पवार, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा, उपाध्यक्ष गोरख धुमाळ, संचालक फुलचंद मुंडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, रमेश आडसकर, सर्जेराव तांदळे, गोविंद केंद्रे, सुभाष सारडा आदींची उपस्थिती होती.पुढे बोलताना पालकमंत्री मुंडे म्हणाल्या, जिल्हा बँकेवर प्रशासक नेमला असताना वसुली कमी व उपलब्ध ठेवी खर्च करण्यात आल्या. बँकेत केवळ १९ कोटी रूपये शिल्लक होते. माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. आम्ही विरोधी पक्षात होतो त्यावेळी स्व. मुंडे व मी समोरासमोर येऊन आरोप केले आहेत. माझ्यावर जे आरोप झाले आहेत त्या आरोपांना मी सामोरे गेली आहे. परंतु काही जण मागून आरोप करीत असल्याचे पालकमंत्री मुंडे यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे नाव न घेता सांगितले.भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे म्हणाले, बँक बुडली असल्याचे माजी अध्यक्षांनी सांगितल्याने बँकेवर विश्वास कोण ठेवणार ? त्यामुळे बँकेच्या ठेवी वाढल्या नाहीत. जिल्हा परिषदेतील बोगस कामांचे बादशहा धनंजय मुंडे आहेत हे आपल्याला माहीत आहे.राष्ट्रवादी पक्ष नव्हे, टोळीमेळाव्यात शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या बहारदार भाषणामुळे सर्व कार्यकर्ते, शेतकऱ्यांची मरगळ दूर झाली. खोत यांनी भाषण सुरू केल्यानंतर स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीला उजाळा दिला. पुढे त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या मुलास आता कोणी मुली देत नाहीत. कारण ग्रामीण भागात विदारक स्थिती निर्माण झाली आहे. राकाँ-काँग्रेसचे सरकार असताना त्यांनी घोटाळे केले. मात्र, चेहऱ्यावर जरासाही लवलेश येऊ दिला नाही. आता भाजपाचे सरकार येऊन सहा-सात महिन्यांचा कालावधी लोटला आहे तोच शरद पवार आरोप करीत आहेत. राकाँ नेत्यांनी वेगवेगळे घोटाळे केली, धरणे गिळंकृत केली, सर्वसामान्य माणूस देशोधडीला लावला. शेतकरी सुखी झाला पाहिजे, अशी भावना राष्ट्रवादी पक्षाची नव्हती. राष्ट्रवादी हा पक्ष नसून टोळी आहे. टोळीचे म्होरके शरद पवार यांना मी हल्ली अलीबाबा म्हणत असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार, खासदार, पगारदारांना दुष्काळाचा फरक पडत नाही. दुष्काळाचा थेट परिणाम शेतकऱ्यावर होतो. रा. काँ. ने दलाल निर्माण केल्यामुळे ग्रामीण भागात तरूणांच्या हाताला काम नसल्याची टीका त्यांनी केली. शेतकरी संघटनेने आंदोलन केले तर मंत्रीपदासाठी आंदोलन केले असे म्हटले जाते. जर शांत बसलो तर हिणवले जाते. त्यामुळे शरद पवारांनी आमची काळजी करू नये. तुमच्या कपाळाचे कुंकू का पुसलं (तुमची सत्ता का गेली ?) याचा विचार करा, असा सवाल त्यांनी केला. (प्रतिनिधी)शेतकरी मेळाव्याप्रसंगी डीसीसीचे अध्यक्ष आदित्य सारडा यांनी प्रास्ताविक केले. उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, बुडलेली बँक पूर्ववत करण्याचा प्रयत्न आहे. या दृष्टीने कामकाज केले जात आहे. कर्जबाजारी लोकांना जोरजबरदस्ती न करता प्रेमाने सांगितल्यामुळे त्यांनी दीड कोटीहून अधिक रूपये जमा केले आहेत. आगामी काळात वसुली वाढविण्यावर भर दिला जाणार असल्याचे ते म्हणाले.
राकाँवर टिकेची झोड
By admin | Updated: July 12, 2015 00:17 IST