लातूर : उजनीचे पाणी पाईपलाईनद्वारे आणण्याच्या योजनेला अद्याप मंजुरी नाही. त्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाच्या वतीने राज्य सरकारकडे सादर करण्यात आलेला आहे. यासोबतच निम्न तेरणा प्रकल्पात असलेला पाणीसाठा बेलकुंड ते लातूर अशा पाईपलाईन मार्गे आणून लातूरच्या पाणीपुरवठ्यासाठी उपयोगात आणण्याच्या हेतूने सर्वेक्षण सुरु असल्याची माहिती लातूरचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी मंगळवारी पत्र परिषदेत दिली. शासनाच्या व जनसंपर्क माहिती विभागाच्या महासंचालनालय व लातूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने काढण्यात आलेल्या घडीपुस्तिकेच्या प्रकाशन सोहळा व एक वर्षाच्या आढाव्यानिमित्त घेण्यात आलेल्या शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्र परिषदेत ते मंगळवारी बोलत होते. प्रारंभी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, महापालिकेचे आयुक्त सुधाकर तेलंग, अतिरिक्त पोलिस अधिक्षक लता फड आणि जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांच्या हस्ते या घडीपुस्तिेकेचे प्रकाशन करण्यात आले. ते पुढे म्हणाले की, गेल्या एक वर्षात सरकारने राबविलेल्या कामाची माहिती देताना ते म्हणाले की, जलयुक्त शिवार या योजनेत जिल्ह्यातील २०२ गावे सहभागी झाली आहेत. सहा महिन्यात तीन हजार ७०६ पैकी ३ हजार २८८ कामे पूर्ण झाली आहेत. तर उरलेली ४१८ कामे प्रगतीपथावर आहेत. ५५ पेक्षा जास्त गावात २०० किमीपेक्षा जास्त लांबीची नाला रुंदीकरणाची कामे झालीत. जिल्ह्यात ५७ हजार ९४५ एपीएल धारक शिधापत्रिकाधारकांना ९१२ मेट्रिक टन गहू तर ६०८ मेट्रिक टन तांदूळ दर महिन्याला दिले जात असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)
उजनीबरोबर निम्न तेरणाच्या योजनेचेही सर्व्हेक्षण सुरू : जिल्हाधिकारी
By admin | Updated: November 25, 2015 00:21 IST