गंगाखेड : येथील संत जनाबाई मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला असून गंगाखेडचे माहेर असलेल्या लेकी-बाळींच्या योगदानातून मंदिर कळसाची स्थापना होणार आहे. महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायातील थोर संतांच्या नामावळीतील संत जनाबार्इंचा ७५० वर्षापूर्वी गंगाखेड येथे जन्म झाला होता. शहरात संत जनाबाईचे मंदिर असून या मंदिराचा जिर्णोद्धार पर्यटन विकास योजनेतून होत आहे. महाराष्ट्र शासनाने मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी दीड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून हे काम अंतिम टप्प्यात आहे. धार्मिक परंपरेनुसार मंदिराच्या शिखराचा कळस गावातील लेकी - बाळीच्या (माहेर असलेल्या) महिलांच्या योगदानातून बनविला जातो. संत जनाबाई मंदिराच्या कळस स्थापनेत शहरातील माहेर असलेल्या १७०० विवाहित महिलांनी आपल्या योगदानातून सांबा, काश्य मिश्रीत ३६ किलो वजनाचा साडेपाच फूट उंचीचा कळस निर्माण केला आहे. संत जनाबाई मंदिर संस्थानच्या वतीने कळस योगदानात सहभाग घेणाऱ्या १७०० लेकी-बाळींचा १२ आॅगस्टपासून ओटी भरून श्रीफळ व पिस देऊन सन्मान करण्यात येत आहे. १५ आॅगस्ट रोजी कळसाची विधीवत स्थापना होणार असल्याची माहिती संस्थानच्या वतीने देण्यात आली. (वार्ताहर)
संत जनाबाई मंदिराच्या शिखरावर लेकी-बाळीचा कळस
By admin | Updated: August 14, 2014 02:08 IST