औरंगाबाद : सातारा-देवळाई परिसरातील पाऊण लाख लोकसंख्या पाण्यासाठी त्रस्त असून, जिल्हा प्रशासनाचेच १० टँकर सातारा-देवळाई दोन्ही वॉर्डात फिरविले जात आहेत. टँकरची संख्या वाढविण्याची मागणी होत असताना उलट तीन दिवसांपासून ३ टँकर घटल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जनतेने पाण्यासाठी पैसे भरूनही दुसऱ्या दिवशी पाणी टँकर मिळत नसल्याची ओरड वाढली आहे. ज्यांनी मनपाकडे पैसे भरलेले नाहीत, अशा लोकांना तर खाजगी टँकरच्या पाण्याशिवाय पर्यायच नाही. मनपापेक्षा ग्रामपंचायत व नगर परिषदच बरी होती असे म्हणण्याची वेळ स्थानिक नागरिकांवर आली आहे.१० टँकर किमान दोन ते तीन फेऱ्या मारून सातारा-देवळाई परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्याची कसरत करीत होते. त्यात वाढीव टँकर व नवीन नोंदणी करावी, यासाठी परिसरातील नागरिक वॉर्ड कार्यालयात जाऊन पैसे भरीत आहेत; परंतु दोन दिवसांआड पाण्याऐवजी दहा दिवसांआड पाणी मिळत असल्याने सातारा-देवळाईकरांच्या घशाची कोरड वाढत चालली आहे.जलस्रोत वाढविणे, रेनवॉटर हार्वेस्टिंग करून छतावरील पाणी बोअरमध्ये मुरविण्यावर सातारा- देवळाईतील रहिवासी भर देत आहेत. परिसरात सिंचनाशिवाय पर्याय राहिलेला नाही. एकीकडे नवीन निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचे आपापल्या परीने पाण्याचे नियोजन सुरू आहे. मात्र औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटीच्या टँकरची संख्या का घटली, याचा जाब पदाधिकाऱ्यांनी कंपनीला विचारलेला नाही.
भर उन्हाळ्यात टँकर घटविले!
By admin | Updated: April 27, 2016 00:30 IST